पाटण :- पाटण शहरात अत्यावश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी नागरीकांची गर्दी होत असताना पाटण नगरपंचायतीने दि. १७ एप्रिल ते २२ एप्रिल पाटण शहर पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या बंद नंतर आज बुधवारी दि.२२ रोजी जिल्हाधिकारी सातारा यांच्या मंगळवारी प्रसारित झालेल्या आदेशानुसार सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेसाठी शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने चालू करण्यात आली. मात्र पाटण परिसरातील सर्वच ग्रामीण भागातील नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपंचायतीने कोणतेच नियोजन न केल्याने पाटण शहरात सोशल डिस्टिंगशनचा फज्जा उडताना दिसला. मात्र गर्दीवर नियंत्रण आणन्यासाठी पोलिसांनी ११ वाजता शहरातील सर्व दुकाने बंद केली. यामुळे नागरिकांना खरेदीविना मोकळ्या हाताने परत जावे लागले.
अत्यावश्यक सेवेतील दुकाने व भाजीपाला सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सोशल डिस्टींगशन च्या नियमाने चालू राहतील या जिल्हाधिकारी यांच्या मंगळवारी झालेल्या आदेशाचे पाटण मधे बुधवारी पुन्हा तीनतेरा वाजल्याचे समोर आले. नगरपंचायतीने पाच दिवसाच्या केलेल्या बंद नंतर बुधवारी सकाळी ९ ते २ यावेळेसाठी शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु करण्यात आली होती. मात्र नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. नवीन स्टैंड, जुना स्टैंड परिसरासह सातारा जिल्हा मध्यवर्ती बैंक महाराष्ट्र बैंक येथे नागरिकांची झुंबड उडाली. या गर्दीत कोणतेही सोशल डिस्टींगशन पाळले जात नव्हते. हि गर्दी पाहून कोरोनाला आमंत्रण देण्याचे नियोजन पाटणकरांचे आहे का..? असे पुन्हा पुन्हा वाटत होते. शेवटी पोलिसांना या गर्दीला पांगवावे लागले.
*ऐकेदिवशी एकच विभाग सोडण्याची मागणी.*
अत्यावश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी पाटण शहर खुले होणार असे समजलेकी पाटण शहराशी संलग्न असणाऱ्या आसपासच्या सर्वच गावातील नागरिक शहरात गर्दी करताना दिसतात. या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस यंत्रणेला देखील कसरती कराव्या लागतात. यासाठी प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाटण शहराशी संलग्न असणाऱ्या मणदुरे, चापोली, वनकुसवडे, येरफळे, येराड या भागातील गावांचे विभाग पाडून ऐकेदिवशी एकच विभाग शहरात खरेदीसाठी सोडल्यास गर्दीवर नक्की नियंत्रण येईल. असे नियोजन करावे अशी अनेकांची मागणी आहे. मात्र या मागणीकडे प्रशासन, नगरपंचायत लक्ष देईल तेंव्हा खरे.