सातारा : गेल्या आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार एन्ट्री करत अशरश: कहर केला आहे. धरणक्षेत्रात पावसाने धुवाँधार हजेरी लावल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर नद्या नाल्यांनी पातळी ओलांडल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. पावसाच्या या हाहाकारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
संततधार पावसामुळे कृष्णा नदीवरील मर्ढे आनेवाडी पूल रात्रीपासून पाण्याखाली गेला. त्यामुळे गावांचा सातारा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जावून दोन दोन महिने पाण्याखाली राहतो. गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी या पुलाची उंची वाढवण्याची मागणी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधीकडे केली असली तरी याबाबत कोणीही दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे .
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ
गेली तीन दिवसांपासून महाबळेश्वर, वाई तालुक्यात संततधार पाऊस सुरू झाल्याने कृष्णा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. तर, भुईंज पाचवड येथील नदीच्या काठावर असणारे बांधीव घाट पुराच्या पाण्याखाली आल्याने हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. सावधानतेचा इशारा म्हणून पाचवड ग्रामपंचायतीच्या वतीने दक्षता घेण्यासाठी नदी तीरावर पथक तैनात केले आहे. तर लिंब – गोवे दरम्यानच्या जुन्या पुलावर पाणी येण्यास सकाळपासून सुरवात झाली आहे.
वाई तालुक्यात गेले 48 तास संततधार पाऊस सुरू असुन वाईच्या कृष्णा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. महागणपती मंदिराशेजारील सिद्धनाथ वाडी पुलावरून पाणी वाहू लागले आहे. अनेक युवकांनी या पुरात पोहण्याचा आनंद लुटला. याचबरोबर वाई तालुक्याच्या धोम व बलकवडी परिसरात सुरू असणार्या या मुसळधार पावसामुळे धरण साठ्यातील पाणीपातळीत वाढ होत आहे.
कोयनेत दमदार पाऊस
धरणात 24 तसात 6 टि.एम.सी. ने वाढ, पाणी साठा 61 टि.एम.सी. पाटण:- पाटण तालुक्यासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने कोयना धरण शिवसागर जलाशयाच्या पातळीत झपाट्या वाढ होत आहे. गेल्या 24 तासात पाऊसाने धरणातील पाणी पातळी 2118. 09 फूट झाली आहे.टि.एम.सी. मध्ये हा पाणी साठा 61 इतका झाला आहे.
ढेबेवाडी : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने गेल्या 24 तासांपासून अशरश: कहर केला आहे. अनेक नद्या, नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर धरणक्षेत्रात धुवाँधार पाऊस सुरूच असल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे अनेक नदीपात्रातून पाणी बाहेर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. (पान 6 वर) पाटण तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने शुक्रवार सायंकाळपासून शनिवार सकाळपर्यंत पंधरा तासात महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्या कोयना धरणात सुमारे पाच टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 47 टीएमसी पाण्याची गरज आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे वांग – मराठवाडी धरण पाणलोट क्षेत्रासह ढेबेवाडी विभागात हाहाकार उडाला आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कोयना धरणात 53.91 टीएमसी पाणी होते. तर आज, शनिवारी सकाळी हा पाणीसाठा 58.67 टीएमसी इतका झाला होता. जाधववाडी-पवारवाडी येथील वांग नदीवर असणारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे परिसरातील 14 गावांचा संपर्क तुटला असून या विभागातील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. याशिवाय वांग-मराठवाडी धरणाच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत असल्याने उमरकांचन गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर धरणाच्या पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात धरण उशाला असूनही या गावाला टॅकरने पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय उमरकांचन गावातील 23 घरे गणेश मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने गावातील शेकडो धरणग्रस्तांना निवारा शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तर जिंती सावंतवाडी परिसरात आठ शेतकर्यांच्या जमिनी धरणाच्या पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात पावसाची संततधार
RELATED ARTICLES