सातारा ः ज्याप्रमाणे बालपण पुन्हा मिळत नाही त्याप्रमाणे शाळेत जाणे ही पुन्हा होत नाही. पण पवारवाडी शाळेतील 1999-2000 वर्षाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्याच वर्गात पुन्हा बसून शालेय आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळच्या शिक्षकांनीही उपस्थिती दाखवत आपल्या विद्यार्थ्यांचा तास घेतला. या तासाला विद्यार्थ्यांनीही चांगलीच उत्तरे दिली अन् ही आठवण कायमस्वरूपी गाठीशी बांधत विद्यार्थ्यांनी जड पावलांनी शाळेचे आवार सोडले. निमित्त होते माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे….
जावली तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेची पहिली शाळा म्हणुन पवारवाडी शाळा बहरत चालली आहे. झाडांना जसी पानगळ झाल्यानंतर पालवी फुटते त्याप्रमाणे गतवर्षी लोकवर्गणी व दानशूरांच्या देणगीतून नुतनीकरण करण्यात आले. यात अनेकांनी हातभार लावला. हीच भावना घेऊन 1999-2000 मध्ये दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. महाराष्ट्र दिनी हा सोहळा विद्यार्थी त्यावेळी शिकत असलेल्या वर्गातच घेतला अन् सर्वच विद्यार्थ्यांच्या भावनांचा बांध फुटला. प्रत्येकजण यावेळी व्यक्त होत आपल्या आठवणी सांगू लागला. तर त्यावेळचे शिक्षक यादव सर, निकम सर, दुदुस्कर सर यांनी ज्ञानार्जन करताना होणाऱया गमतीजमती व आठवणी सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह़र्यावर हास्य दिसून येत होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रवीण सावंत, नीलेश पवार, मंगेश पवार, विजय मोरे, सुनिता वारागडे, मेघा चव्हाण, शितल चव्हाण यांच्यासह सर्वच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नीलिमा गायकवाड हिने सूत्रसंचालन केले. यावेळी मुख्याध्यापक दिलीप घोरपडे, यादव सर, निकम सर, दुदुस्कर सर यांच्यासह शिंदे मामा, दिलीप पवार, दळवी मामा यांचाही विद्यार्थ्यांतर्फे सत्कार करून ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला.
पवारवाडी शाळेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
RELATED ARTICLES