Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीफुले - आंबेडकर साहित्य पुरस्कार घोषित ; कुमार केतकर, सुषमा अंधारे,...

फुले – आंबेडकर साहित्य पुरस्कार घोषित ; कुमार केतकर, सुषमा अंधारे, अरुण जावळे पुरस्काराचे मानकरी


सातारा  ( प्रतिनिधी ):-  भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था, सातारा यांच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे फुले – आंबेडकर साहित्य पुरस्कार महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत पद्मश्री खा. कुमार केतकर यांना तर युवा साहित्य पुरस्कार साहित्यिक अरुण जावळे यांना घोषित करण्यात आला आहे. तसेच यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध वक्त्या व भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्या आणि शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे याना जाहीर झाला आहे. ९ मे रोजी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते सातारा येथे शारदा आश्रमाच्या प्रांगणात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. रोख रक्कम १० हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन सस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुरस्काराबाबत माहिती दिली. माहिती देताना ते म्हणाले, मागील २६ वर्षापासून भारतीय फुले – आंबेडकर साहित्य पुरस्कार देत असून यंदाचा म्हणजेच २७ वा पुरस्कार हा कुमार केतकर यांना देण्यात येणार आहे. गतवर्षी हा पुरस्कार ख्यातनाम पत्रकार निखिल वागळे यांना दिला होता. मागच्या सात वर्षापासून संस्थेने युवा साहित्य पुरस्कार देण्यास सुरूवात केली असून यंदाचा आठवा पुरस्कार साताऱ्यातील पत्रकार व साहित्यिक अरुण जावळे यांना जाहीर केला आहे. गतवर्षी हा पुरस्कार विदर्भातील प्रा. प्रशांत वंजारे यांना दिला होता. या पुरस्काराप्रमाणेच भटक्या विमुक्त चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला जीवन गौरव पुरस्काराने यथोचित सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत १५ मान्यवरांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यावर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सुप्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. गतवर्षी हा पुरस्कार हरिदास जाधव यांना देण्यात आला होता.

फुले – आंबेडकर विचारधारेला अनुसरून परिवर्तनाच्या चळवळीत आपल्या कार्याच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकार, लेखक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था या पुरस्काराच्या माध्यमातून आजवर घेत आलेली आहे. स्वतंत्र समता, बंधुता ही मूल्य अबाधित ठेवण्यासाठी परिवर्ननाची लढाई अशीच सुरू रहावी यासाठी समाजात विशेष योगदान देणाऱ्यांचा गौरव करणं हा प्रमुख उद्देश ठेवून पुरस्कार देण्याची परंपरा संस्थेने २६ वर्षांपासून जपली आहे, असेही पद्मश्री लक्ष्मण माने यांनी शेवटी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला नारायण जावलीकर, हरिदास जाधव, अशोक जाधव व संघटनेतील इतर पदाधिकारी उपस्थित होते. वरील तिन्ही मान्यवरांची निवड संघटनेच्या निवड समितीने केली असून शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular