सातारा : सातार्याचे सांस्कृतिक जीवन संपन्न करण्याचे बहुमोल कार्य अश्वमेध ग्रंथालय विविध उपक्रमाद्वारे सातत्याने करीत आहे. समाजातील साहित्यिक कलावंत हे आपल्या प्रतिमेतून जे विचारधन निर्माण करतात ते समाजजीवनाला प्रवाही आणि प्रसन्न ठेवण्यास प्रेरक असते. चांगले साहित्य हे समाजाच्या उत्कट प्रतिक्रिया व्यक्त करीत असते, अशा साहित्यिकांच्या वाट्याला कधी संघर्ष तर कधी सन्मान येतो. साहित्यिक मानसन्मानापेक्षा अभिव्यक्त होण्यातला आनंद घेत असतो. पुरस्कार ही त्या आनंदाला दिलेली दाद असते. साहित्य सकस असल्याचे शिफारसपत्र म्हणजे अक्षरगौरव पुरस्कार होय, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंत पाटणे यांनी काढले.
अश्वमेध ग्रंथालयाच्या वतीने कै. भास्करराव माने यांचे स्मृत्यर्थ दिल्या जाणार्या अक्षर गौरव साहित्य पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक डॉ. रवींद्र झुटिंग- भारती, अध्यक्ष शशिभूषण जाधव, उपाध्यक्ष दत्तात्रय मोहिते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अक्षर गौरव 2018 चा पुरस्कार सुनील जवंजाळ यांच्या काळीज काटा, डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांच्या महाराणी येसूबाई, अॅड. वर्षा देशपांडे यांच्या कोयत्याच्या मुठीत आणि डॉ. संदीप श्रोत्री यांच्या कासवांचे बेट यांना प्रदान करण्यात आला. यावेळी रवींद्र भारती यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देताना पुरस्कार वितरणाचे हे सातवे वर्ष असून, सातत्याने वाचन संस्कृतीला बळ देण्याचा प्रयत्न अश्वमेध ग्रंथालय करत आहे, असे सांगितले.
आलेल्या कलाकृतींच्या विषयी गौरवपूर्ण उल्लेख करून आजच्या काळात माणसाने व्यक्त होणे ही काळाची गरज आहे.
बदलणार्या भोवतालात माणूसपण टिकवायचे असेल, तर जाती पाती आणि धर्माच्या भींतींपलिकडे जावून माणसाने माणूसपण जपायला पाहिजे. साहित्यिकांनी ग्रंथांच्या माध्यमातून ते कार्य करायला पाहिजे. या कृतज्ञ भावनेतून हे पुरस्कार सुरू केले असून, ते साहित्यिकांना ऊर्जा देण्याचे कार्य करतील. असे मत डॉ. राजेंद्र माने यांनी व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना सुनील जवंजाळ यांनी ग्रामीण भागातील वेदनेला न्याय देणेसाठी काळीज काटा ही कादंबरी लिहिल्याचे सांगितले. वर्षा देशपांडे म्हणाल्या, रस्त्यावरच्या लोकांच्यात मिसळून काम करण्याचा आमचा पिंड आहे. तळागाळात काम करताना ऊसतोड मजुरांचे दु:ख मांडण्याचा प्रयत्न कोयत्याच्या मुठीतून मधून केला आहे. तर डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी महाराणी येसूबाईंचे कर्तृत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे व त्यांना ऊर्जा मिळावी म्हणून कादंबरी लिहिल्याचे सांगितले. तसेच डॉ. संदीप श्रोत्रीनी त्यांनी केलेल्या भ्रमंतीतून तेथील भौगोलिक स्थितीचे आलेले अनुभव कासवांचे बेट मधून व्यक्त केल्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता प्रभुणे यांनी केले. तर आभार शशिभूषण जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास बाबुराव शिंदे, विजय मांडके, प्रा. श्रीधर साळुंखे, प्रमोद चतुर, मिनाज सय्यद, बाळकृष्ण शिंदे, डॉ. अजय देशमुख, विश्वास ठोके, जयंत देशपांडे, शैलजा जाधव, प्रदीप कांबळे, डॉ. शाम बडवे, कांता भोसले, संगीता केंजळे, पोपटराव मोरे, सादिक खान, गौरव इमडे, संदीप साबळे, मदन देशपांडे, निलेश पवार, आदी उपस्थित होते.
साहित्य सकस असल्याचे शिफारसपत्र म्हणजे अक्षरगौरव पुरस्कार : डॉ. यशवंत पाटणे
RELATED ARTICLES