सातारा : गेली नऊ दिवस अतिवृष्टी ने अस्मानी संकटात सापडलेल्या लोकांना मदतीसाठी शेकडो हात सरसावले आहेत पण, रस्त्यावर वाहने थांबवलेल्या चालक,क्लीनर-मदतनीस यांची तहान-भूक भागविण्यासाठी सातारा जिल्हात खाकी वर्दीने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे परवाना मागणार्या वाहतूक पोलीसांच्या हातातून अन्न-पाणी स्वीकारताना काही वाहनचालक, क्लीनर चे डोळे पाणावले होते.
सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरून थेट देशाच्या कानाकोपर्यात माल वाहतूक केली जाते. अशावेळी महापुरात रस्त्यावर अडकून पडलेल्या लोकांसाठी सातारा पोलीस यंत्रणा माणुसकी दूतासारखी धावून आली आहे. वाठार पोलीस ठाणे अंतर्गत रस्त्यावरील या पाहुण्यांसाठी पोलीस बांधवांनी यजमानांची जबाबदारी स्वीकारली आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने रस्त्यावर अडकून पडलेल्या लोकांना अल्पोहार, जेवण देण्याचे कार्य करीत आहेत. त्यामुळे अनेकांचे कुटुंबातील सदस्य सातारा पोलिसांना विविध भाषातून मनापासून धन्यवाद देत आहेत.
सार्वजनिक सण, उत्सव, ईद, जयंती, निवडणुका,दंगल, संकट समयी पोलिसांना बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करावे लागते. अशावेळी शाबासकीची थाप पाठीवर पडते आणि कधी कधी टीकेचा भिडीमार सहन करावा लागतो. यातून बाहेर पडत पोलीस यंत्रणा माणुसकीचे दर्शन घडवित आहेत. आपल्या स्वतःच्या गावातील पूर परिस्थिती विसरून असे कार्य करणे खूप अवघड असते पण, मदतीला धावून आलेल्या सर्व घटकांच्या सामाईक प्रयत्नाने अनेकांना दिलासा मिळाला आहे.
काल शुक्रवारी सातारा शहरात दुपारी दोन वाजता पाच मिनिटांसाठी सूर्य दर्शन मिळाले पण, पुन्हा पाऊस सुरू झाला असला तरी माणुसकी ही न थांबणारी प्रक्रिया आहे. हाच आदर्श या निमित्त मदत करणार्या सातारा जिल्ह्यातील सर्व माणुसकीच्या दूतांनी दिला आहे.सध्या महाराष्ट्र,कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश,राजस्थान, बिहार ते ईशान्य भारतातील अनेक वाहन चालक व त्यांचे सहकारी पोलीस दलाच्या मदतीने आपण सातारा जिल्हात सुखरूप असल्याचा निरोप घरातील मंडळींना देत आहेत.त्यामुळे सातारचे नाव देशातील खेडयात पोहचल्या अभिमान वाटत आहे.
टोलनाक्यावर भोजनाची व्यवस्था करून जपली बांधिलकी
गोडोली : पावसाच्या हाहाकाराने महामार्गावर रस्ते बंद झाले. अनेक ठिकाणी पुराच्या पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली. आनेवाडी टोल नाक्यावर तब्बल148 वाहने अडकून पडली. त्यांना आनेवाडी टोल प्रशासन आणि नँशनल हायवे पेट्रोलींग टीम कडून पाणी, भोजनाची व्यवस्था आणि औषधोपचार सुविधा उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जोपासली.दोन दिवस ही व्यवस्था जागेवर जाऊन आनेवाडी टोल प्रशासन आणि हायवे पेट्रोलींग टीमने दिलेल्या मदतीमुळे वाहन चालक,वाहकांची गैरसोय दुर झाली. व्यवसाया बरोबर सामाजिक भान ठेवून केलेल्या या कामाचे अनेकांकडून विशेष कौतुक होत आहे.
सातार्यात वाहन परवाना मागणार्या खाकी वर्दीच्या हातांनी भागवली अनेकांची तहान-भूक
RELATED ARTICLES