सातारा : गेल्या चार वर्षात स्थानिक कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांना विकासाबाबत अनेकदा निवेदने दिली, स्थानिक अडचणी सांगितल्या. याबाबत ठोस भूमिका कोणत्याही नेत्याने घेतली नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या वाढत्या सातारा दौर्याने स्थानिक कार्यकर्ते त्रस्त्र झाले आहेत. काहींची सरकारमध्ये असूनही विरोधी भूमिका व काही विरोधक हे सरकारची बाजू मांडत असल्याचे चित्र सातारा जिल्ह्यात दिसत आहे.
आधी लगीन कोंढाण्याचे नंतर रायबाचे, हे निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. त्यामुळे आता खासदारकीची माळ गळ्यात पडावी, यासाठी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे खा. उदयनराजे भोसले व माढ्याचे खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात कराड, पाटण, सातारा, कोरेगाव, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, जावली व सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सत्ताधारी भाजपने चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. सातारसाठी पुरुषोत्तम जाधव व विक्रम पावसकर यांचे नाव भाजपकडून चर्चिले जात आहे. तर काँग्रेस, आरपीआय, रासप, सेना यांच्याकडे सक्षम उमेदवार नाहीत. भारिप बहुजन महासंघाच्या वंचित आघाडीच्यावतीने एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार आणि भारिप बहुजनचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांची चाचपणी सुरु झाली आहे. राजकीय पक्षाचे गणित पाहता सध्यातरी खासदार उदयनराजे भोसले यांचे पारडे जड आहे. इतर पक्षांची त्यांना अप्रत्यक्ष मदतच होणार आहे. परंतू खरा धोका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच होण्याची शक्यता आहे. अशावेळी शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी छत्रपतींचे वंशज म्हणून खासदार उदयनराजे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, त्यांना सेनेच्यावतीने पाठिंबा दिला जाईल, असे जाहीर करुन टाकले. त्यामुळे सेनेकडून धनुष्यबाण उचलण्यास सज्ज झालेल्या सेना उमेदवारांचे अवसान गळून पडले आहे. सध्या सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांपासून ते अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांपर्यंत अनेकांनी जनतेच्या समस्यांबाबत आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात चार वर्षात सातारकरांची झोळी रिकामीच राहिली आहे. या झोळीत आतापर्यंत काहीच पडले नाही, याची जाणीव मतदारांना झालेली आहे. एकूणच लोकसभेचा आवाका पाहता सत्ताधारी व विरोधक यांना छाप पाडता आली नाही. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचा प्रचाराचा उत्साह कमी झाल्यास आश्चर्य वाटणार नाही, अशी स्थिती आहे.
राजकीय नेत्यांच्या वाढत्या सातारा दौर्याने स्थानिक कार्यकर्ते त्रस्त
RELATED ARTICLES