औंध :- वार्ताहर. :- रेशनिंग पासून वंचित असलेल्या केशरी कार्ड धारकांंना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत समावेश करून त्यांना स्वस्त दरातील नियमित अन्न धान्य मिळावे यासाठी हरणाई सुत गिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला मेल पाठवून तातडीने वंचित केशरी कार्डधारकांना रेशनिंग देण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री यांना मेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे की. २०१४ साली राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुरवठा विभागाकडून प्रत्येक गावातील एकूण केशरी कार्ड धारकांच्या ७४ टक्के कार्डधारकांचा समावेश प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत करून त्यांना स्वस्त दरातील अन्न धान्य वापट करण्यात येत आहे. मात्र उर्वरित २६ टक्के केशरी कार्डधारक या योजनेपासून वंचित राहिल्यामुळे त्यांना शासनाच्या वतीने देण्यात येणारे स्वस्त दरातील धान्य मिळत नाही. कोरोना मुळे सध्या पात्र असलेल्या केशरी कार्डधारक आणि अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सवलतीच्या दरातील धान्याचे शासनाच्या वतीने वाटप केले आहे. मात्र २६ टक्के वंचित केशरी कार्डधारकांची ससेहोलपट सुरू आहे. माण खटाव मधील दुष्काळी तालुक्यातील गरीब गरजू कुटुंबाना सध्याच्या भीषण स्थितीत दिलासा देण्यासाठी रेशनिंग कार्डधारकांना सरसकट लाभार्थी कुटुंब योजनेत समावेश करून त्यांना सवलतीच्या दरातील स्वस्त धान्य मिळण्यासाठी संबधीतांना आदेश करावेत अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. निवेदन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री प्रुथ्वीराज चव्हाण यांना देखील मेल करण्यात आल्या आहेत.