वडूज : राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी अचानक भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांना किंवा दुसर्यांना मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. पक्षाला फंलटणमध्ये एका खंबीर गटाची गरज आहे. तर प्रस्थापितांच्या विरोधात लढण्यासाठी रणजितसिंहांनाही एका सत्ताधारी मजबूत पक्षाची गरज होती. त्यामुळे जुने सर्व ऋणानुबंध विसरुन त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाचा बोलवता धनी दुसराच असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मितीला लोकसभा निवडणूकीचे घोडे गंगेत न्हावून निघेल मात्र भविष्यात ङ्ग त्यांच्या म प्रवेशामुळे खटाव, माण व फलटण या तीन तालुकतील मात्तबरांची गोची होणार असल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये आहे.
माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे माढा मतदारसंघात भाजपाच्या गोटात आनंदी आनंद आहे. तरीही फलटण मतदारसंघात उघडपणे युतीला मतदान दिसत नव्हते. त्यामुळे पाठीमागच्या लोकसभा निवडणूकीप्रमाणे फलटणमध्ये दगा होवू नये याकरीता युतीचे मात्तब्बर या खेपेस सुरुवातीपासूनच सावध झाले आहेत. त्यामुळे त्यांनी उमेदवारीचे गाजर दाखवून रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना आपल्याकडे वळविले. यामागे फलटण तालुका मजबूत करण्याबरोबरच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षलाच फोडून विरोधकांना मोठा अपशकून घडविण्याचा डाव खेळला गेला. दुसरीकडे विधानसभा राखीव, लोकसभेला आघाडी धर्म पाळणे यामुळे मोठा दुध उद्योग, साखर कारखाना, आर्थिक संस्था एवढे बळ असूनदेखील नगरपालीका, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे लहान सहान खेळ खेळावे लागत असल्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर अस्वस्थ होते. त्यातच त्यांच्या घराण्याने एकेकाळी हिंदुराव नाईक निंबाळकरांच्या रुपाने खासदारकीचे वैभव चांगलेच अनुभवले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा करिश्मा, पुलवामा हल्यामुळे अचानक निर्माण झालेली युतीची लाट, सोलापूरमधून मोहिते-पाटलांकडून मिळणारी ताकद तसेच माण मतदारसंघातून युतीच्या पारंपारिक मताबरोबर मिळणारा मैत्रिचा ङ्ग अदृष्य हात म. या बळावर रणजितसिंहांनी लोकसभेचे शिवधनुष्य पेलण्याची तयारी दर्शविली आहे.
त्यांच्या या पावित्र्यामुळे भविष्यात तीन तालुक्यातील मात्तबरांची चांगलीच गोची होण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रवेशाची घोषणा झाल्यानंतर लगेचच फलटणचे भाजपा तालुकाध्यक्ष व माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री कदम यांनी प्रवेश देताना आम्हास विश्वासात घेतले नाही. असे म्हणत बंडाचे निशान फडकवले आहे. दुसरीकडे युवा नेते दिगंबर आगवने हे गेली 8 ते 10 वर्षे रणजितसिंहांबरोबर कार्यरत होते. मात्र मागील सहा महिन्यापूर्वी त्यांनी केलेल्या प्राणांतिक उपोषणापासून दोघांची गट्टी फुटल्याची चर्चा आहे. नाईक निंबाळकरांना सोडून आगामी विधानसभा निवडणूकीचे गणित डोक्यात ठेवून आगवने भाजपाशी जिव्हाळा वाढविण्याच्या तयारीत होते. मात्र आता नेत्याचाच प्रवेश झाल्याने ज्या म्हातारीसाठी घर सोडायचे तीच म्हातारी पुन्हा कारभारीन या म्हणीचा प्रत्यय दिगंबरशेठना येण्याची शक्यता आहे. अश्या परस्थितीत ते झाले गेले विसरुन तालुक्याचा स्वाभिमान म्हणून जुन्याच स्वराज्यास बळकटी आणण्यासाठी पूर्ववत सरदारकी कायम ठेवणार की माढ्याच्या मामाचा लळा लावून घेणार ? हे पाहण्यासाठी थोडावेळ थांबावे लागणार आहे.
फलटण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात झालेल्या गडबड, घोटाळ्यानंतर शेखरभाऊ गोरे पक्षापासून दूर जावू लागले होते. त्यानंतर ते भाजपा, शिवसेनेच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची चर्चाही होती. मात्र आता त्यांनाही सावध पावले टाकावी लागणार आहेत. कारण रणजितसिंहांच्या प्रवेशावेळीच विधानसभेचेही साखर पेरणी झाल्याची चर्चा आहे. यासंदर्भात विद्यमान आमदारांनी मरळनाथकर सदाभाऊंच्या सल्याने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यापासून मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरही बैठकी केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यातच त्यांनी पंढरपूर येथे माजी आमदार दिपकआबा साळुंखे यांच्या फार्महाऊसवर झालेल्या ङ्ग डिनर म डिप्लोमसीलाही गैरहजेरी दाखवून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. अश्या परस्थितीत शेखरभाऊंना भविष्यात सावध पाऊले टाकावी लागणार आहेत.
माणचे दुसरे युवा नेते अनिलभाऊ देसाई मराठा तिथुका मेळवावा या न्यायाने महसूल व बांधकांम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून भाजपाला चांगलेच चिकटले होते. सत्तेच्या माध्यमातून छोटे-मोठे कार्यक्रम घेण्याबरोबरच आपली स्वत:ची ताकद वाढवत त्यांनी स्वत:च्या उद्योग व्यवसायाला अच्छे दिन आणले आहेत. मात्र आता विधानसभेचे पुढे काय ? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. तिसरीकडे खटावचे माजी आमदार काळाची पाऊले ओळखून काही काळ राष्ट्रवादीत राहून परत भाजपात आले आहेत. वरिष्ठ पातळीवरील जुन्या संबंधाचा उपयोग होवून माण मतदारसंघाचा झेंडा आपल्या हाती येईल अश्यासाठी ते आशावादी आहेत. मात्र भविष्यात नाईक-निंबाळकरांच्या हाताला धरुन विद्यमान आमदार जयकुमार गोरे भाजपात आले तर डॉ. येळगांवकरांना व्यासपीठावर जेष्ठ नेते म्हणून वावरण्याबरोबर अरबाच्या ऊंटाची कथा आत्मसात करावी लागणार आहे.
हे सर्व जर तरच्या शक्यतेवर अवलंबून आहे. तत्पूर्वी लोकसभेचा एक टप्पा पूर्ण होणार आहे. व तद्नंतरच अनेक घडामोडी जलद गतीने होणार आहेत. तोपर्यंत सर्वत्र चर्चाच होत राहणार आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भाजपा प्रवेशामुळे मात्तबरांची गोची
RELATED ARTICLES