Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीआठ दिवसांत रस्त्यांची कामे न झाल्यास आंदोलन करणारः अविनाश कदम

आठ दिवसांत रस्त्यांची कामे न झाल्यास आंदोलन करणारः अविनाश कदम

साताराः सातारा शहरात भुयारी गटर योजनेचे काम सुरु आहे. शहरातील व्यंकटपुरा पेठ आणि मंगळवार पेठेचा काही भाग याठिकाणी सुमारे 8 महिन्यांपुर्वी भुयारी गटर योजनेच्या पाईपलाईन टाकल्या आणि चेंबर बांधण्यात आले आहेत मात्र, काम झाल्यानंतर उकरलेल्या रस्त्यांचे पॅचिंग अथवा खडीकरण, डांबरीकर केले गेले नाही. त्यामुळे या भागात नागरिकांना जीव मुठीत घेवून ये-जा करावी लागत आहे. पावसाळ्यात गंभिर परिस्थिती निर्माण होवू शकते त्यामुळे पालिका प्रशासनाने येत्या आठ दिवसात या भागातील रस्त्यांचे काम करावे, अन्यथा नागरिकांना घेवून तिव्र आंदोलन छेडू, असा इशारा नगर विकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम यांनी दिला आहे.  यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात कदम यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरात भुयारी गटर योजनेचे काम सुरु होते. मंगळवार पेठेतील खांबेटे बोळ आणि शहाणे बोळ तर, व्यंकटपुरा पेठेत सर्वच ठिकाणी भुयारी गटर योजनेच्या पाईपाईन टाकण्यात आल्या तसेच चेंबरही बांधण्यात आले आहेत. यासाठी संबंधीत ठेकेदाराने रस्त्यांची खुदाई केली आहे. भुयारी गटर योजनेचे काम पुर्णत्वास जावून आता 8 महिने उलटले आहेत तरीही खोदलेल्या रस्त्यांकडे पालिका प्रशासन आणि संबंधीत ठेकेदाराने अक्षम्य असे दुर्लक्ष केले आहे. रस्त्यांचे पॅचिंग न झाल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत घेवून वाहने चालवावी लागत आहेत. पावसाळा तोंडावर आला असून या रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण झाले नाही तर, नागरिकांपुढे गंभीर समस्या उभी राहणार आहे.  रस्त्यांची कामे करण्यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी यांच्यासह बांधकाम विभागाचे अभियंता सर्वचजण रजेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांना गंभीर समस्येने ग्रासले असताना पालिकेत मात्र कोणीही हजर नाही अशी गंभीर परिस्थिती आहे. संबंधीत ठेकेदाराकडे रस्त्यांच्या कामाबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत तर, पालिकेचे अभियंता साबळे यांच्याकडे विचारणा केली असता ठेकेदाराचे काम आहे आम्ही काय करणार? अशी बेजबाबदार उत्तरे मिळत आहेत. पालिका प्रशासनास नागरिकांच्या समस्यांचे काहीही देणेघेणे नसल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. नागरिकांना होत असलेला नाहक त्रास दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने येत्या आठ दिवसांत मंगळवार पेठ आणि व्यंकटपुरा पेठेतील रस्त्यांचे काम करुन द्यावे. अन्यथा नागरिकांना सोबत घेवून पालिका प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा अविनाश कदम यांनी दिला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular