पाटण:- सातारा लोकसभा मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांकडून आर.पी.आय. च्या कार्यकर्त्यांना सन्मानपुर्वक वागणूक मिळत नसेल तर या निवडणुकीत वेगळा विचार करण्याचे स्वातंत्र्य आर.पी.आय. च्या कार्यकर्त्यांना व मतदारांना आहे. असा इशारा रिपब्लिकन पार्टी औफ इंडिया चे पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रा. रविंद्र सोनावले यांनी पाटण येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
भाजप-शिवसेना महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ नवारस्ता ता. पाटण येथे आज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला पाटण तालुक्यातील आर.पी.आय. च्या कोणत्याच कार्यकर्त्यांना अथवा पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले नाही. अथवा कोल्हापूर येथील महायुतीचा प्रचार शुभारंभ सभा झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात झालेल्या इतर मेळाव्याला देखील आर.पी.आय.च्या कार्यकर्त्यांना अथवा पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले नाही. सातारा जिल्ह्यातील शिवसेना-भाजप नेत्यांना आर.पी.आय. ची ताकद लहान वाटत असली तरी ती निर्णायक आहे. हे आम्ही निवडणुकीत दाखवून देऊ.
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात आर.पी.आय. ला सन्मानाची वागणूक मिळाली नाही. म्हणूनच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांनी भाजप-शिवसेनेच्या महायुतीत सहभागी होऊन महायुतीला सहकार्य केले. त्याचे परिणाम काँग्रेस आघाडी भोगत आहे. व निवडणुकी पासून सहन करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामदास आठवले यांच्या विचाराने चालत असलेल्या आर.पी.आय. पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना डावलून केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामदास आठवले यांचे फोटो निवडणुकीच्या बैनरवर लावून निवडणुकीत मत मिळत असतील तर ती खुशाल घ्या. मात्र आर. पी. आय. चा कार्यकर्ता, पदाधिकारी आणि मतदार महायुतीच्या उमेदवारांस मतदान करण्यास बांधीलच आहे असे नाही. असे शेवटी प्रा. रवींद्र सोनावले यांनी सांगितले.