सातारा, दि.31 (जि.मा.का) : एकता काय करु शकते, किती प्रचंड ताकद एकतेमध्ये असते याचे महत्व सरदार वल्लभाई पटेल यांनी समाजाला पटवून दिले आहे, त्यांचे आदर्श विचार पुढच्यापिढीपर्यंत पोहचवणे ही काळाची गरज असून त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास समाजाची आणखीन प्रगती होऊ शकते, असा विश्वास जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज व्यक्त केला.
सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाप्रशासनाकडून ‘रनफॉर युनिटी’ अर्थात एकता दौड आयोजित करण्यात आली. या एकता दौडला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हिरवा झेंडा दाखवून या एकता दौडीचा प्रारंभ केला. यावेळी त्या बोलत होत्या. या एकता दौडला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उप अधिक्षक अशोक शिर्के, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
31 ऑक्टोंबर सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती दिवस या दिवसानिमित्त आज महाराष्ट्रभर एकता दौडचे आयोजन करण्यात आले असून आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सरदार वल्लभाई पटेल यांनी एकतेचे महत्व तर समाजाला पटवून एकतेची संकल्पना समाजाला दिली आहे. त्यांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणून त्यांच्या विचारानुसार आदर्श समाज घडवूया, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी केले.
लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे फलक ठरले एकता दौडेतील आकर्षण
भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, लाच देणे व घेणे हा गुन्हा आहे, लाच मागितल्यास तक्रार कुठे करावयाची यासह अनेक विविध फलक घेऊन लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी, कर्मचारी या एकता दौडमध्ये सामील झाले होते हे फलक एकता दौडमधले आकर्षण ठरत होते.
सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आठडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लाच देणे व घेणे हा गुन्हा आहे या विषयी शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रबोधन करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये एकतेची शपथ देणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी यावेळी सांगितले.
सकाळी 8 वाजता निघालेली एकता दौड ही पोवईनाका-पोलीस अधीक्षक कार्यालय – शेटे चौक-कमानी हौद-पोलीस करणुक केंद्र-नगरपालिका- जिल्हा वाहतुक शाखा रविवार पेठ अशी आयोजित करण्यात आली होती.
0000