Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीस्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेच्या पाठीमागे खरा अभिनेता प्रताप गंगावणे: शंतनु...

स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेच्या पाठीमागे खरा अभिनेता प्रताप गंगावणे: शंतनु मोघे

पाटण: साहित्य, नाट्य, चित्रपट, गीतकार अशा समृध्द परंपरेेचा वारसा लाभलेेले वडील श्रीकांत मोघे आणि काका सुधीर मोघे अशा सुसंस्कृत कुटुंबाच्या घराण्यात जन्म झाला. नाट्य, चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा वडिलांपासून मिळाली. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर करिअरबाबत विचार करत असता लोकांचा आणि पैशाचा विचार करु नकोस, आवडत नाही ते दबावाखाली करायचे नाही. देवाने खूप सुंदर आयुष्य दिले आहे. जे आवडते तेच निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे हेच क्षेत्र करिअरसाठी निवडलं. भूमिकेत शिरल्यावर भूमिकेशी प्रामाणिक राहून काम करण्यामुळे जीवनालाही अर्थ लाभतो. साडेतीनशे वर्षाहून अधिक काळ शिवरायांवर असणार्‍या जनमाणसाच्या अपार श्रध्देमुळे भूमिकेला यश मिळाले असल्याचे सांगून या पडद्यावर जरी आम्ही भूमिका पार पाडत असलो तरी या मालिकेच्या यशस्वीतेमागे प्रताप गंंगावणे यांचा सिद्धहस्त आहे. पडद्यामागील यशाचा शिल्पकार-अभिनेता आहे. शिवराय व संभाजी महाराजांच्या जीवनातील खर्‍याखुर्‍या ऐतिहासिक घटना, प्रसंग आणि साक्षात काळ उभा करणार्‍या पटकथाकार प्रताप गंगावणे व शिवाजी महाराजांची भूमिका करणार्‍या अभिनेते शंतनू मोघे यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
येथील स्वा. सै. भडकबाबा पाटणकर नगरीत सुरू असलेल्या ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनात स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेचे पथकथाकार प्रताप गंगावणे व मालिके शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते शंतून मोघे यांची कवी प्रदीप कांबळे यांनी प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी या मालिकेची पार्श्वभूमी आणि मालिकेला मिळालेल्या यशाची वाटचाल उलगडून दाखविली.
अभिनेते शंतनू मोघे म्हणाले, वतनदारीचा वध करून रयतेचा विश्वास संपादन करण्याचा विचार बिंबवणार्‍या शिवाजी महाराजांना माणूस म्हणून लोकांसमोर आणण्याचे महत्कार्य प्रताप गंगावणे यांच्या सिद्धहस्त लेखणीने केले आहे. रयतेचे आराध्यदैवत असणार्‍या शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची मिळालेली संधी हा जीवनातील भाग्याचा क्षण असून हे भाग्य डॉ. अमोल कोल्हे, प्रताप गंगावणे आणि झी टीव्हीमुळे मला लाभले. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेत गोदावरीची भूमिका साकारणारी प्रिया सारखी सहचारिणी असून तिची भक्कम साथ लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
पटकथाकार प्रताप गंगावणे यांनी सांगितले, लिखाणामुळे डोंगराएवढी माणसं भेटली, माणूस वाचण्याची कला लाभली, आयुष्याला वैचारिक बैठक मिळाली, आपली स्फूर्ती, चेतना आणि श्वास असणार्‍या शिवरायांच्या आणि संभाजी महाराजांच्याविषयी इतिहासात सर्वात जास्त गैरसमज निर्माण करण्यात आले आणि विकृत इतिहासाच्या धारणेचे हे ओझे समाजमनाने शतकानुशतके वाहिले. बाजीराव मस्तानीचाही विकृत इतिहास मांडला गेला. अतुलनीय पराक्रम गाजवून आगर्‍यातील लालकिल्ल्यापुढे मुघल सल्तनितीच्या उरावर घोडे नाचवणार्‍या बाजीराव पेशवे यांना इतिहासकारांनी बदफैली, अय्याशी ठरवले. तर आरसपाणी सौंदर्य लाभलेल्या आणि संत असलेल्या मस्तानीला इतिहासकारांनी नाची ठरवून विकृत इतिहास पुढे आणला. लिखाणामुळे डोंगराएवढी माणसं भेटली. माणूस वाचण्याची कला लाभली. बदफैली, ऐय्याशी, व्यसनी अशी प्रतिमा निर्माण करून संभाजी महाराजांचा इतिहास रंगवण्यात आला. समृद्ध ग्रंथालय आणि पाच ग्रंथांचे लेखन करणारे संभाजी महाराज बदफैली, ऐय्याशी, व्यसनी कसे असू शकतात? संभाजी महाराजांच्या धगधगत्या जीवनात रचलेले गोदावरी प्रकरण विकृत असून इतिहासकारांनी रचलेला विकृत इतिहास पुसून संभाजी महाराजांचा खराखुरा इतिहास समोर आणणे हा अवघड विषय होता. इतिहासाचा डोळस अभ्यास करून खरा इतिहास समोर आणण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे सामर्थ्य लाभल्याने इतिहासकारांनी रचलेला विकृत इतिहास खर्‍या इतिहासाला आव्हान देऊ शकत नाही. इतिहासातील गोम ओळखल्यामुळेच खरा इतिहास पुढे आला. संभाजी महाराजांचा खरा इतिहास साकारण्यासाठी ऐतिहासिक पार्श्वभूमी, वास्तू, घटना, प्रसंग, काळ, दस्तऐवजांचा अभ्यास केला. आई, वडील, मोठा भाऊ, गुरुजनांचा संस्कार यामुळेच लेखनप्रवासाची वाटचाल सुरू झाली. तीन पानांच्या धड्यासाठी अख्खे नाटक वाचून दाखवणारे एस. आर. पाटील सर आणि लहान वयात वाचनासाठी चांदोबा अंक आणून देणारा मोठा भाऊ यांच्यामुळे लेखन प्रवासाच्या वाटचालीला पंख लाभले. डल्ला मारणे, भ्रमाचा भोपळा फुटणे, आळा घालणे, ससेमिरा लावणे या वाक्यप्रचाराच्या उत्पत्तीचा तसेच शब्दांशब्दांचा शोध घेतला. आजपर्यंत विविध भाषेतील 80 चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून 20 पटकथा तयार आहेत. दहा व्यावसायिक नाटके तसेच बारा बालनाट्यांचे लेखन केले असल्याचे सांगून स्वातंत्र्य सैनिक भाई भडकबाबा पाटणकर यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी विक्रमबाबा पाटणकर यांनी ग्रंथ महोत्सव आणि साहित्य संमेलनाचे केलेले आयोजन प्रबोधनाचा जागर ठरेल आणि या ऐतिहासिक क्रांतीस्थळावरील सत्कार उर्जा देणारा असल्याचे पटकथाकार प्रताप गंगावणे यांनी सांगीतले.
यावेळी प्रताप गंगावणे यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी स्वागत केले. दादासाहेब कदम यांनी सुत्रसंचालन केले. अभिनेते समृद्धी जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास भाजपचे प्रवक्ते भरत पाटील, काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, आरपीआयचे तालुकाध्यक्ष रवींद्र सोनावले, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, शिवसेनेचे तालूकाध्यक्ष सुरेश पाटील, सपोनि उत्तमराव भापकर, अभिनेते संजय पाटील, आयेशा सय्यद, उदयसिंह पाटणकर, दिलीपराव मोटे, आबासाहेब भोळे, एकनाथराव थोरात, ए. व्ही. देशपांडे, अशोकराव देवकांत, ज्ञानदेव गावडे, सय्यद हकीम, पी. डी. खांडके, शंकर कुंभार, यादवराव देवकांत, जयवंतराव पाटील, फत्तेसिंह पाटणकर, जगदीश पाटणकर, डॉ. रघुनाथ नांगरे यांच्यासह ग्रंथ, साहित्यप्रेमी, श्रोते, युवक, युवती, महिला उपस्थित होत्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular