साताराः येथील रा.ना.गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकांतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा मानाचा सातारा भूषण पुुरस्कार 2017 सालासाठी सामाजिक कार्यकर्त्या व प्रसिध्द व्याख्यात्या आणि भारतीय संस्कृती व कुटूंबसंस्था जपण्यासाठी गेली 2 दशके कार्य करणार्या आणि अनाथ व वंचितांना सांभाळून त्यांच्या उन्नतीसाठी कार्य करणार्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
सातार्याजवळील जकातवाडी येथील कुलकर्णी घराण्यात त्यांचा जन्म झाला. तेव्हाचे ज्येष्ठ वकील काशिनाथराव कुलकर्णी यांचे चिरंजीव यशवंत यांच्या कन्या पुर्वाश्रमीच्या सुनिता यशवंत कुलकर्णी विवाहानंतर सौ. अपर्णा रामतीर्थकर झाल्या. काही अपरिहार्य कारणामुळे शाालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षणात खंड पडला होता मात्र पुढे मुलगा 12 वीला गेल्यानंतर त्यांनी सोलापूर मध्येच शिक्षणास पुन्हा सुरूवात केली आणि 46 व्या वर्षी वकिलीची पदवी मिळवली. कोर्टामध्ये कौटूंबिक प्रश्न, वैवाहिक तंटे अशा केसेस चालविताना त्यांनी कोर्टापेक्षा असे प्रश्न त्यांच्या घरी जावून, संवाद साधून मिटविणे योग्य ठरेल असा निष्कर्ष काढला आणि त्यादृष्टीने प्रत्यक्ष कामास सुरूवात केली. त्यात त्यांना उत्तम यश आले. गेल्या 14-15 वर्षात सुमारे दोन हजार मुलींचे घटस्फोट वाचले ते संसार सावरले आणि ती कुटूंबे आज सुखाने नांदत असून अपर्णाताईना दुवा देत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न लक्षात घेवून त्यारंनी अनेक वृध्दांना आधार दिला. अन्यायग्रस्त महिलांना, परितक्त्यांना विविध प्रशिक्षण देवून आत्मनिर्भर करण्यासाठी उद्योगवर्धिनी ही संस्था स्थापन केली जी आज महिलांचे आधारकेंद्र बनली आहे. पाखर सकुंल या त्यांच्या संस्थेमार्फत अनाथ बालकांना सांभाळून त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर पारधी समाजाच्या मुलांना सांभाळून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी त्या गेली 10 वर्षे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी सोलापूर जिल्हयात अशा मुलांसाठी त्यांचे भारतमाता वसतिगृह कार्यरत आहे. याशिवाय ढासळती कुटूंबव्यवस्था आणि संपत चाललेले संस्कार यावर मात करायची असेल तर सामाजिक प्रबोधनाला पर्याय नाही अशी त्यांची दृढनिष्ठा आहे. त्यासाठी त्या सातत्याने अनेक ठिकाणी व्याख्याने देवून प्रबोधन करतात. त्या व्याख्यानांना उदंड प्रतिसाद मिळत असतो. आजवर अशी 2000 हून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत.
त्यांच्या या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. त्यांचे हे सर्व कार्य राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी प्रेरणादायी आहे.
गोडबोले ट्रस्ट तर्फे 1991 पासून प्रतिवर्षी ज्ञान, विज्ञान, अर्थ, कला, क्रिडा, सामाजिक कार्य, अध्यात्म अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्या सातारा जिल्हयाच्या सुपूत्रास सातारा भूषण पुरस्काराने गौरविले जाते. पुरस्काराचे यंदा 27वे वर्ष असून यापुर्वी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, छोटा गंधर्व, प्रा. शिवाजीराव भोसले, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर, डॉ. नीलकंठ कल्याणी, फरोख कुपर, शेतकरी संघटनेचे शरद जोशी, शाहीर साबळे, यमुनाबाई वाईकर, कै. नरेंद्र दाभोलकर, रयत शिक्षण संस्था, ऑलिंपिअर धावपटू ललिता बाबर आदी मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यावर्षी अमरसिंंह पाटणकर, ज्येष्ठ पत्रकार मधू नेने आणि ट्रस्टचे विश्वस्त अशोक, डॉ. अच्युत गोडबोले व उदयन गोडबोले यांच्या निवडी समितीने केली आहे.रू.25000/- व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून तो लवकरच समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती गोडबोले ट्रस्टचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ करसल्लागार, चित्रपट निर्माते व साहित्यिक अरूण गोडबोले यांनी दिली आहे.
2017 चा सातारा भूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या व प्रसिध्द व्याख्याता अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांना जाहीर
RELATED ARTICLES