खा. श्रीनिवास पाटील यांचे प्रतिपादन * महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या पत्रकारिता पुरस्काराचे सातार्यात वितरण
सातारा : मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये दर्पण या नियतकालिकाने मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया रचला. त्यांनी दर्पण हे नाव समर्पक ठेवले आहे. कारण आरसा जसे सत्य दाखवतो, त्याचप्रमाणे वृत्तपत्राने सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे. दर्प म्हणजे उग्र वास.. सुगंधाच्या नेमके उलट. दर्प नसावा. दर्प’ला ‘ण’ जोडला तरच दर्पण होतो. पत्रकारांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श ठेवून समाजाला पुरक असे काम करावे, असे प्रतिपादन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले.
मराठी वृत्तपत्र सृष्ठीचे आद्य जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ 6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्याने महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचे वतीने ग्रामिण पत्रकारितेतील अलौकीक कार्याप्रती प्रतिवर्षी देण्यात येत असलेले नवरत्न दर्पण पुरस्काराचे वितरण रविवारी सातारा येथील शाहू कला मंदिरात करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिवेंद्रराजे भोसले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, सारंग पाटील, माहिती व जनसंपर्क महासंचनालयचे संचालक प्रशांत सातपुते, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सातारा शहर अध्यक्ष विनोद कुलकर्णी, अनंत इंग्लिश स्कूलचे प्राचायर्य एस. एम. शेख, संयोजक राजीव लोहार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, 1832 मध्ये ज्यांनी दर्पण’द्वारे मराठी वृत्तपत्र क्षेत्राचा पाया रचला. त्यांनी आपल्या वृत्तपत्रास दिलेले दर्पण हे नाव अतिशय सार्थ आहे. आरसा हा समोर जे आहे जसे आहे तसेच प्रतिबिंबीत करतो. त्याचप्रमाणे वृत्तपत्राने काही लोकांना काय छापावे वाटते, ते छापू नये तर समाजातील सत्य परिस्थिती मांडावी. एखादा माणूस जर आरशात पाहताना त्याला चेहर्यावर धूळ दिसली तर तो चेहरा साफ करेल. तरीही धुळ दिसत असली तर ती धूळ चेहर्याला नव्हे तर आरशाला आहे, हे तो समजेल. पत्रकारांनीही आरशावरील धूळ झटकण्याची गरज आहे. पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या जोरावर आपली विश्वसनीयता निर्माण करावी. दर्प म्हणून उग्र वास. तो असता कामा नये. दर्प’ला शेवटी ‘ण’ जोडला की दर्पण म्हणजेच आरसा होतो. पत्रकारांनी समाजाला सत्य परिस्थिती सांगणारा आरसा व्हावे. बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श ठेऊन काम करावे समाजाला पूरक अशी पत्रकारिता करावी.
कला, क्रीडा आणि ज्ञान संपन्न यांचा संगम झाला तर व्यक्ती आदर्श बनते. आजच्या कार्यक्रमात पत्रकार क्षेत्रातून अशा आदर्श अशा नवरत्नांचा सत्कार होत आहे. त्यांच्या हातून आणखी उत्तुंग कार्य घडावे, व याही पेक्षा मोठे पुरस्कार मिळावेत, अशा शुभेच्छा खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिल्या.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारच्या पत्रकारांची एक वेगळी ओळख आहे. जे चुकतंय ते चुक म्हणायची धमक त्यांच्यात आहे. जिल्ह्यातील जे पत्रकारांचे अपघाताने अथवा अकाली निधन झाले त्यांच्या कुटुबियांच्या मागे जिल्हा पत्रकार संघ खंबीरपणे उभा राहिला, याचा मी साक्षीदार आहे. पत्रकार संघाचे हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. सध्या वर्तमान पत्रे कात टाकत आहे. पूर्वी वृत्तपत्र सकाळी आपल्या हातात पडायची वाट पाहावी लागत होती. मात्र आता वेब पोर्टल्समुळे हे क्षेत्र वेगवान झाले आहे. घटना घडल्यानंतर काही वेळातच लोकांच्या स्मार्ट फोनवर ती बातमी येवून थडकते. त्यामुळे आगामी काळात याचाही विचार करून पत्रकारांनी या गतिमान क्षेत्रात वाटचाल करावी, असे मत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले.
नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी पुरस्कार प्राप्त सर्व पत्रकारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवरत्न दर्पण विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमात नवरत्न दर्पण पुरस्कार व विविध स्पर्धा पारितोषिक प्रदान – गुणगौरव समारंभात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्माणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आले. मुद्रीत माध्यम पत्रकारिता क्षेत्र- प्रशांत सातपुते, दै. ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव, मुक्तागिरीचे संपादक अनिल देसाई, दीपक शिंदे, दीपक प्रभावळकर, संजीव कदम, ज्ञानेश्वर भोईटे, जितेंद्र जगताप, उमेश भांबरे, गजानन चेणगे, प्रशांत जाधव, खंडू इंगळे, गोरख तावरे, शशिकांत पाटील एकता दर्शन-दिपावली विशेषांक, अजित जगताप यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
इलेक्ट्रॉनिक मिडीया माध्यम ः राहूल तपासे, सुजित आंबेकर, इम्तियाज मुजावर, तुषार तपासे, किरण मोहिते, ओंकार कदम, संतोष नलवडे, संतोष शिंदे, गुरूनाथ जाधव, निखील मोरे, प्रशांत जगताप यांना पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
सामाजिक क्षेत्रातील राजेंद्र सरकाळे, राजेंद्र मोहिते, नरेंद्र यादव, संदीप माळी, चंद्रकांत काळे, अॅड.जनार्दन बोत्रे, प्रशांत मोरे, डॉ. निता वि.भोसले, शिल्पा पाटील, सबाजीराव गायकवाड, निलेश कुलकर्णी, सुनिताताई धायगुडे, चंदन पाटेकर, मेहबूब पानसरे, मोहन पवार, प्रा. बी. एस. पाटील, रविंद्र वैरागी, कु. एैश्वर्या कदम, निता चावरे आदींना गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रामध्ये सातारा एज्यूकेशन सोसायटीचे अनंत इंग्लिश स्कूल, साताराचे गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थींनी गुणदर्शी कार्यक्रम सादर केले. सुत्रसंचालन पत्रकार विजय लोहार यांनी केले.
दर्पणकारांचा आदर्श घेऊन पत्रकारांनी समाजाला दिशा द्यावी
RELATED ARTICLES