सातारा : उदयनराजे भोसले यांना खासदारकीसाठी लकी चार्म ठरलेला सातार्याचा दिल्ली दरवाजा उपेक्षेच्या गर्तेत सापडला आहे. हा दिल्ली दरवाजा म्हणजे सातारा पालिकेचे उत्तराभिमुखी प्रवेशद्वार असून हे प्रवेशद्वार म्हणजे येणार्या जाणार्यांची पिंकदानी झाली आहे. पिचकार्यांचे लाल रंग, उखडलेले पेव्हर, जिन्याचे वाकलेले बार यामुळे या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्याची मागणी होत आहे. दिल्ली दरवाजाला झळाळी आणि उदयनराजे यांची खासदारकीची हॅट्रिक याची चर्चा पालिका वर्तुळात रंगू लागली आहे.
सातार्याच्या दिल्ली दरवाजाची कहानी अत्यंत मनोरंजक आहे. नगरविकासाची दूरदृष्टी ठेवणारे नगररचना व बांधकाम विभाग सातार्यात नावालाच आहे. अभियांत्रिकीचा कोणताच संबंध नसणारे सातारा पालिकेचे निवृत्त अधिकारी अनिल भोसले यांनी स्वतः पाठपुरावा करून पालिकेच्या उत्तराभिमुखी प्रवेशद्वाराचे डिझाईन बनवले. मात्र या प्रवेशद्वारावर श्रेयवादाचे राजकारणच फार रंगले. तत्कालीन मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी यांनी भोसले यांचे संकल्पक हे नाव टाकण्यासाठी राजकीय दबावातही कोनशिला बदलायला लावली होती. मनोमिलनाच्या काळात खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या प्रवेशद्वाराचे उद्घाटन झाले.
या उद्घाटन सोहळ्यात कॉम्रेड किरण माने यांनी भाषणामध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी शनिवार वाडा उत्तराभिमुखी बांधून दिल्लीचे तख्त काबीज केले असा वाडयाच्या दिल्ली दरवाजाचा संदर्भ दिला होता. तसाच योगायोग सातार्यात घडावा आणि या पालिकाप्रवेशद्वाराच्या उदघाटनानंतर उदयनराजे यांना खासदारकी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आणि घडले ही तसेच प्रवेशद्वार उद्घाटनानंतर उदयनराजे यांची भूमाता गौरव दिंडीचा राजकीय फार्स सुपरहिट ठरला आणि राजेंनी विक्रमी मतांनी 2009 मध्ये पहिल्यांदा दिल्ली गाठली. तेव्हापासून सातारा पालिकेच्या नव्या प्रवेशद्वाराला गंमतीने दिल्ली दरवाजा म्हणले जाते. मात्र उदयनराजेंसाठी लकी ठरलेले हे प्रवेशद्वार पिचकारी मारणार्यांचे आवडते ठिकाण झाले आहे. काही निर्लज्ज महाभागांनी चक्क कोनशिलेवर पिचकार्या मारल्या आहेत. जिन्याच्या पायर्यांना काही ठिकाणी तडे गेले आहेत. बर्याच ठिकाणचे पेव्हर उखडले असून जिन्याचे बार चक्क वाकले आहेत. या प्रवेशद्वाराची चक्क रया गेली असून या प्रवेशद्वाराच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकातही कोणतीही तरतूद करण्यात आली नाही.
चौकट- सातारा पालिकेत सध्या टक्केवारीचा बाजार आणि बेपत्ता इंजिनिअर हा विषय प्रचंड गाजतो आहे. राजकीय आडोशाने ओव्हरटेंडरिंगचा खेळ नियोजनबद्ध पध्दतीने सुरू आहे. अगदी रस्ते विकास अनुदानाचा निधी उपलब्ध नसतानाही राजवाडा परिसरात डांबरीकरणाचा घाट बांधकाम विभागाने घातला आहे. या घोटाळ्यांमध्ये प्रत्यक्षात गरजेच्या विकास कामांना कोठेच संधी नाही . सातार्याच्या दिल्ली दरवाजाच्या दुर्देवाचे दशावतार थांबवणे हे सत्ताधार्यांच्या हातात असताना येथे टक्केवारीची आंधळी कोशिंबिर सुरू आहे. तीन महिन्यापूर्वी या विषयाचा प्रस्ताव देण्याचा प्रयत्न स्थायी समितीत झाला होता मात्र तिथेही राजकारणात तो विषयं हाणून पाडण्यात आला.
सातार्यातील दिल्ली दरवाजा उपेक्षेच्या गर्तेत न. पा. प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्याची मागणी
RELATED ARTICLES