सातारा : संपूर्ण देशात 1 ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये स्वच्छ, र्सुदर शौचालय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 1 कोटी 34 लाख स्पर्धकांनी सहभाग घेतला असून सोमवार दि. 24 जून रोजी विज्ञान भवन, दिल्ली येथे विजेत्या स्पर्धकांचा गौरव समारंभ होणार आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचाही गौरव होत असून ही अभिमानाची बाब ठरली आहे.
देशात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच शौचालय उभारण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करावे यासाठी केंद्र सरकारच्या जनशक्ती मंत्रालयाने स्वच्छ भारत मिशन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये व्यक्तिगत पातळीवर तसेच जिल्हास्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. व्यक्तिगत पातळीवर व विशेष प्रयत्न केलेल्या 15, जिल्हा पातळीवर 10 आणि राज्य पातळीवर 3 तसेच केंद्र शासित प्रदेशातील 2 स्पर्धकांची या गौरवासाठी निवड करण्यात आलेली आहे. तशा प्रकारचे पत्र 20 जून रोजी संबंधितांना पाठविण्यात आले असून हा सोहळा दि. 24 जून रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे दुपारी 3 वाजता होणार आहे. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या समवेत विविध विषयांचे सभापती, अधिकारी व सफाई कामगार यांचेही मोलाचे योगदान शौचालय स्वच्छतेच्या जनजागृतीबाबत लाभले आहे.
सातारा जिल्हा परिषदेचा देशपातळीवरील हा दुसरा गौरव आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाची केंद्रात व राज्यात सत्ता नसतानाही सातारा जिल्हा परिषदेने केलेल्या या कामगिरीचे खर्या अर्थाने मूल्यमापन करुन सामाजिक स्वच्छतेसाठी हा मिळालेला गौरव स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नपूर्तीकडे नेणारा आहे, अशा शब्दांत अनेकांनी जिल्हा परिषदेचे अभिनंदन केलेले आहे.
भविष्यात शौचालय स्वच्छतेबाबत त्रुटी राहू नयेत, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेषत: सार्वजनिक शौचालये व शाळा-महाविद्यालयातील शौचालयांची स्वच्छता राखण्यासाठी नागरिक व विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करावेत, असे आवाहन उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, कृषी सभापती मनोज पवार व महिला व बाल कल्याण सभापती सौ. वनिता गोरे यांनी केले आहे.
स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेत सातारा जिल्हा परिषदेचा होणार गौरव
RELATED ARTICLES