पाटण : जनतेला अक्षरशः हैराण करून सोडणारे सध्याचे सरकार हे कोणतेही काम सुरळीत करीत नाही. मोदींच्या हाती देशाचा कारभार दिल्यापासून सर्वांचीच त्रेधातिरपीट होत चालली आहे. बेरोजगारांचा उद्रेक, अन्नधान्यासाठीच्या रांगा, सात – बारासाठी प्रतीक्षा, शेतीमालाचे घसरलेले भाव आणि विकासकामांची केवळ भंपक जाहिरातबाजी यामुळे वैतागलेली जनता आता देशात परिवर्तन घडवेल, असे मत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाटण तालुक्यातील प्रचार दौर्यात ते बोलत होते.
रामापूर, मल्हारपेठ व चाफळ येथे सोमवारी जाहीर प्रचारसभा झाल्या. त्यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, जि. प. चे शिक्षण सभापती राजेश पवार, जि. प. सदस्य रमेश पाटील, अॅड. अविनाश जानुगडे, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य हिंदूराव पाटील, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, सुनील काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, पाच वर्षांपूर्वी ज्यांच्या हाती मोठ्या विश्वासाने देशाची सूत्रे जनतेने सोपवली, त्या मंडळींनी बेबंदशाही कारभार केला. जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काहीही देणे – घेणे नाही. आंधळं दळतयं, आणि कुत्रं पीठ खातय, असा त्यांचा कारभार सुरू आहे. दिल्लीत मोदी केवळ आहे म्हणायला आहेत. ते देशात थांबायलाच मागत नाही. त्यांचे विमान सतत विदेशभ्रमंती करत असते. त्यांच्या गैरहजेरीत अमित शहा हुकूमशाही पद्धतीने मनमानी कारभार करताना दिसत आहेत. दुसर्या पक्षातील नेतेमंडळींना धमकी देऊन आणि धाकधपटशाहीने स्वतःकडे वळविण्याचा प्रयत्न करणारांना धडा शिकवण्यासाठी उदयनराजेंना पुन्हा दिल्लीत पाठवा. कारण कधीही हाक मारताच लगेच धावून येणारे ते तळमळीचे नेतृत्व आहे. पाटणला तर ते स्वतःचाच तालुका समजतात. त्यामुळे त्यांना निवडून देने आपले कर्तव्यच आहे, असेही विक्रमसिंह पाटणकर यांनी यावेळी सांगितले.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, जेव्हा मी एकदा नक्की म्हणतो, त्यावेळी ते नक्कीच असते. याचा अनुभव डोंगरदर्यातील जनतेने घेतला आहे. त्यामुळे विकासाची ही गंगा आणखी गतिमान करण्यासाठी जनतेने निर्णय घ्यावा. जीएसटी, रेरा, नोटबंदी लागू करून सध्याच्या सरकारने जनतेचे जगणे हलाखीचे केले आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करू म्हणणारे तरूणाईच्या हाताला काम देण्यात आणि शिक्षणाची भूक भागवण्यात अपयशी ठरले आहेत. ज्या वयात आई- वडिलांचा आधार व्हायचे, त्या काळात रोजगार, शिक्षण यांच्या अभावी तरुणाई वैफल्यग्रस्त झाली आहे. केवळ या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच ही वेळ आली आहे. त्यामुळे आता सत्तांतराशिवाय गत्यंतर नाही. ते 2 कोटी तरुणांच्या हाताला काम देणार होते. त्या तरुणांना वा-यावर सोडून देऊन त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला. देशाचं मोठं नुकसान केलं. आज नैराश्याने ग्रस्त असलेली ही पिढी दुर्दैवाने व्यसनांच्या आहारी गेली आहे. आख्खी पिढी बाद करण्याचे पाप करणार्या सरकारला निवडणुकीत धडा शिकवावा लागेल.
रमेश पाटील म्हणाले, उद्याची लढाई ही केवळ जिल्ह्याची नव्हे तर तालुक्याचीही लढाई आहे. जे जिल्ह्यात चित्र आहे तेच काही महिन्यात पाटण तालुक्यातही दिसणार आहे. सत्यजितदादांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकजूट दाखवावी. हिंदूराव पाटील यांनी त्यांच्या भाषणात, विरोधी मंडळी लोकांना कसे भुलवतात आणि सत्तेवर आल्यानंतर कसा उन्माद मांडतात, हे आपण सध्याच्या सरकारकडून अनुभवतो आहोत, अशी टिका केली.देशाचे नेतृत्व आणि आपल्यासारख्या सर्व जनतेचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. जनतेला फसवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला घरी घालवावे लागेल, असे आवाहन सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.
यावेळी प्रताप देसाई, बापूराव जाधव, शब्बीरभाई, ईक्बालभाई गडकरी, मन्सूरभाई शेख, मुबारकभाई, सय्यद हकीम, खलीलभाई, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे शफिकभाई शेख, रणजित पाटील, शिवाजीराव शिंदे, सुरेश पाटील, विक्रम सत्रे, अविनाश पाटील, अमोल माने, रवी पाटील, पं. स. सदस्या रुपालीताई पवार, दादासाहेब यादव, पांडूरंग यादव, सुभाष पवार, दिनकर घाडगे, राजाभाऊ काळे, मोहनराव पाटील, मारुती साळुंखे, शिवाजीराव पाटील, विजय चव्हाण, अरूण पवार, दिनकरराव घाडगे, नथुराम झोरे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
सत्ताधार्यांकडून विकासाची भंपक जाहिरातबाजी
RELATED ARTICLES