पाटण :- कोरोना महामारीचे संकट सहजासहजी संपणार नाही यासाठी प्रशासन आपल्यापरीने सर्वतोपरी प्रयत्नशील असले तरी आता आपल्यातील प्रत्येक घटकाने वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी स्विकारून यावर मात करण्यासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. आपली खबरदारी हीच आपली जबाबदारी हे धोरण स्विकारत आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संस्था आदींनी या कोरोना उपाययोजना व खबरदारीबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. आपणच कुटुंब, गाव, विभाग, तालुका व विधानसभा मतदारसंघात जर अशा पद्धतीने जनजागृती केली व प्रशासनालाही सातत्याने सहकार्य केले तर निश्चितच आपण या कोरोना युध्दावर सार्वत्रिक विजय मिळवू अशी खात्री राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केली.
पाटण विधानसभा मतदारसंघातील मान्यवर पदाधिकारी व अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, नगराध्यक्ष संजय चव्हाण, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजाभाऊ काळे आदी मान्यवर नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, आजपर्यंत आपल्या मतदारसंघात कोरोनाचा शिरकाव होवू दिला नाही. यासाठी प्रशासन व स्थानिक जनतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. परंतु आता शासन, प्रशासन त्यांच्याकडून दैनंदिन येणारे नवनवीन आदेश, नियम, शिथीलता व इतरत्र अडकलेल्या भूमिपुत्रांच्या प्रवेश परवानगी यामुळे पुन्हा कोरोनाचा संभाव्य धोका वाढण्याची शक्यता आहे. आजवर ज्या पद्धतीने आपण खबरदारी, काळजी घेतली त्याहीपेक्षा अधिक काळजी घेऊन येणार्या काळात आपल्याला काम करायचे आहे. आगामी काळात किमान काही महिने तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधने, सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करणे, सॅनीटायझरचा व साबणाचा वापर, स्वच्छता ही महत्त्वाची आहे. याशिवाय कोणतेही मोठे सण, उत्सव, समारंभ आयोजित न करणे व अशा ठिकाणी जायला टाळणे हे आपल्याला करावेच लागणार आहे. ज्या पद्धतीने प्रशासन शक्य असेल त्या ठिकाणी शिथीलता देत आहे व अडचण झाल्यास कठोर कारवाई करत आहे. अशा ठिकाणी त्यांना त्यांचे काम करू द्या, त्यांना सहकार्य करा. या मर्यादित व्यवस्थेवर अवलंबून न रहाता ग्रामीण व शहरी भागातील अगदी खेडेपाड्यातही शेवटच्या घटकापर्यंत या कोरोना खबरदारीसाठी जनजागृती करा. ही जनजागृती करताना पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते आदींनी प्रशासनाने घालून दिलेले नियम, निर्बंध याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. याशिवाय बाहेर गावातून येणारे बांधव हे आपलेच आहेत त्यांना गावात प्रवेश देताना प्रशासनाला त्याची माहीती द्या व नियमानुसार काही दिवस त्यांना क्वारंटाइन करून सार्वत्रिक आरोग्याची काळजी घ्या.
या कोरोना संकट काळात त्रास होतो आहे ही वस्तूस्थिती असली तरी हळूहळू यातून मार्गही निघत चालला आहे. नियम, निर्बंध हे आपल्याच हितासाठी असल्याने प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. गावागावात राजकारण विरहित गट, तट, पक्ष बाजूला ठेवून सार्वजनिक हित व आरोग्यासाठी या चळवळीत सहभागी व्हा. जीवनावश्यक व आवश्यक दुकाने, बाजारपेठा भलेही खुल्या असतील तरी गरजेपुरते बाहेर पडा व त्यावेळी योग्य ती खबरदारी घ्या. शेवटी जसे आपले अधिकार आहेत तशीच आपली कर्तव्येही आहेत. याचीही जाणीव ठेवा. ज्या पद्धतीने आपण कोरोनाला मतदारसंघात शिरकाव करू दिला नाही तीच परंपरा कोरोना जगातून हद्दपार होईपर्यंत कायम ठेवू असा विश्वासही शेवटी सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला.