खटाव : सावित्रीबाई फुले यांनी फक्त विचारच मांडले नाहीतर तेच विचार प्रत्यक्ष जगल्या. स्त्री शिक्षणाची मशाल पटवणार्या सावित्रीबाई यांनी सामाजिक भान ठेऊन सर्वच क्षेत्रात आपले वेगळापण सिध्द केले. आपल्या सक्रीय सामाजिक कार्याबरोबरच लेखणीतूनही तत्कालीन समाजकंटकाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणाऱ्या सावित्रीबाईंच्या कविता आपल्या वाटतात. त्यांना लिहलेल्या सामाजिक कवितेंबरोबर निसर्ग कवितांची वर्णन वाचलीतर त्यांच्या प्रतिभा संपन्नतेची जाणिव झाल्याशिवाय राहत नाही. मराठी साहीत्यकांनी सावित्रीबाईंच्या साहीत्याचा उचित सन्मान करावा. आद्यकवी केशवसुतांच्याही आधी सावित्रीबाईंनी मराठी विश्वाला कवितेची वेगळा दृष्टिकोन दिला. मराठीमधील सावित्रीबाई फुले या आद्य कवयीत्री आहेत. असे मत प्रेरणादायी वक्ते विशाल सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने डिस्कळ येथील माळी समाज बांधव तसेच अखिल भारतीय माळी महासंघ तालुका खटाव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी उपस्थित प्रा. प्रविण शेंडे, मुख्याध्यापक राजेखान डांगे, ग्रामपंचायत सदस्य श्री संदिप कर्णे, माजी ग्रा.पं. सदस्य श्री हणमंत भुजबळ, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री अमोल भुजबळ सर, आदर्श युवा संस्थेचे अध्यक्ष श्री आनंद कर्णे, दिग्वीजय सांस्कृतीक मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र कर्णे, तानाजी घनवट, संजय कर्णे, एकनाथ कर्णे, विजय कर्णे, राजाराम भुजबळ, रामचंद्र कर्णे यांसह दोस्ती ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य तसेच अखिल भारतीय माळी महासंघाचे खटाव तालुकाध्यक्ष मयूर कर्णे यांसह समाजातील मान्यवर मंडळी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.
शाळेतील कार्यक्रमानंतर श्री संत शिरोमणी सावतामाळी मंदिरातही गावातील समाजातील स्ञीयांच्या हस्ते क्रांतीज्योती साविञीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे फोटो कायमस्वरूपी लावण्यात आले व त्यांचे पूजनही करण्यात आले. त्यावेळी महिलांच्या हस्तेच प्रतिमेसमोर नारळ फोडण्यात आला व काही महिलांनी व मुलींनी त्यानिमित्ताने प्रथमच पुढे येऊन आपले मनोगत व्यक्त करून नियोजित कार्यक्रमाचे कौतुकही केले व बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल आभारही व्यक्त केले. त्यानंतर पुरूष मंडळींनीही आपले विचार यावेळी सर्वांसमोर व्यक्त करून साविञीबाईंना अभिवादन केले. यावेळी माळी समाजातील तसेच गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरूष उपस्थित होते. शेवटी इथून पुढे या महान विभूतींचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अंधश्रद्धा व जुन्या रूढी परंपरांना बळी न पडता सत्यशोधकपणे कार्यरत राहण्याचा निश्चय सर्व उपस्थितांनी केला.