पाटण, दि. 1 ( शंकर मोहिते):- शेतकरी आस्मानी संकटाला तोंड देत असताना कृषी अधिकारी प्रविण आवटेंसारखा सुर्याजी पिसाळ खाजगी कंपनीचा ठेका घेवून जाहीरातबाजी करत असेल तर आम्हाला हासूड हातात घ्यावा लागेल. पोलिसांकडूनही चोर सोडून सन्यासाला फाशी दिली जात आहे. कायद्याचे रक्षक कायदा पाळत नसतील तर कायदा मोडून पायातले हातात घ्यावे लागेल. विक्रमबाबांसह इतरांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. अन्यथा जिल्हा कृषी कार्यालयाला टाळे ठोकावे लागतील, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गोडसे यांनी कृषी आणि पोलीस यंत्रणेला पाटण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
शंकरराव गोडसे पुढे म्हणाले, कृषी विभागाने मल्हारपेठ येथे घेतलेला कार्यक्रम हा प्रायव्हेट लि. कंपनीचा होता. शासनाला माहिती न देता मलिदा गोळा करण्याचा अधिकाऱ्याचा प्रयत्न आहे. कंपनीची जाहिरातबाजी करत असाल तर त्यांचा जाब विचारावाच लागेल. शेतकऱ्यांच्यावर आस्मानी संकट आले असतानाही सरकार मात्र काहीच बोलत नाही. त्यातच अशा पध्दतीने कृषी विभागाचे अधिकारी वागत असतील तर त्यांचा मस्तवालपणा उतरावा लागेल. तमाशासारख्या राहुट्या उभ्या करून खाजगी कंपनीचा प्रचार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात यापुढे चाबूकफोड आंदोलन करावे लागेल.
खाजगी ठिकाणी हा प्रकार घडला असताना पोलीस यंत्रणेने 353 हे कलम कसे काय लावले? असा सवाल करून पोलीस यंत्रणेनेही चोर सोडून सन्यासाला फाशी देण्याचा प्रकार केला आहे. कायद्याचे रक्षकच कायदा पाळत नसतील तर कायदा हातात घ्यावा लागेल. कायद्याची पायमल्ली नको. कृषी विभागात सन्मान करावा अशा लायकीचा एकही कर्मचारी नाही. संपूर्ण कृषी विभाग भ्रष्टाचाराने बरबटलेला असून त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल. हप्ते गोळा करायला खाजगी पोशाखात गेलेल्या पोलिसांना मारहाण झाली तर 353 कलम होत नाही याची आठवण करून देवून गोडसे म्हणाले, विक्रमबाबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रतिक्रिया समोर आली असून विक्रमबाबांच्या पाठीशी जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी उभे करू. यासंदर्भात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे. तसेच रात्री-अपरात्री संबंधितांच्या घरी जावून नातेवाईकांना पोलीस यंत्रणेने त्रास देवू नये. अन्यथा पोलिशी वेशातील दरोडोखोर म्हणून आम्हाला पोलीस यंत्रणेविरूध्द तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही शेवटी त्यांनी बोलताना दिला.