पाटण :- देशाला आर्थिक मंदीच्या जबरदस्त फटका बसत आहे. यापुर्वी शहरी विभांगापुरती मर्यादित ही झळ आता ग्रामीण विभागातही पोहोचलेली आहे. सध्याचे केंद्र व राज्य शासनाचे धोरण हेच याचे मुळ आहे. मुळातच शहरी विभागांची समृद्धी करण्याचा दृष्टिकोन ठेवून ग्रामीण भागांना सार्वत्रिक सोयी सुविधांपासून वंचित ठेवण्याचा या मंडळींचा डाव होता परंतू ते दोन्ही पातळ्यांवर अपयशी ठरले आहेत. ग्रामीण विभागांचा कणा हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या जिव्हाळ्याचा मानला जातो. याउलट या मंडळींनी पश्चिम महाराष्ट्रावर फक्त अन्यायच केला. या सर्व अन्यायाची परतफेड आपल्याला विधानसभा निवडणुकीत करायची असून त्याचीच मुहूर्तमेढ रोवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. राज्यात परिवर्तनाची नांदी घडविणारी ही यात्रा गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता पाटण येथे येणार असून यावेळी आपल्या विधानसभा मतदारसंघातील सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून पाटणमध्येही पुन्हा परिवर्तन घडवून आणूया असे आवाहन राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.
शिवस्वराज्य यात्रेच्या नियोजनासाठी पाटण येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार, पंचायत समिती सभापती सौ. उज्ज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सत्यजीतसिंह पाटणकर यावेळी बोलताना म्हणाले येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला वाट्टेल ते करून येथे परिवर्तन घडवून आणायचे आहे. राज्यात आपल्या पक्षाची निर्विवाद सत्ता यायची असेल तर त्याची सुरूवात आपल्या मतदारसंघातून करूया. या निवडणुकीत आपल्या बरोबर कोण नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहेत त्यांच्या विश्वास व सोबतीने हा विजय मिळवायचा आहे. अंतर्गत दुफळी, समज, गैरसमज सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. ज्यावेळी एखादी क्रांती घडवायची असते त्यावेळी पाटणकर गट हा पेटून उठतो याची झलक आपण २००९ च्या निवडणुकीत दाखवली होती. आता त्याच विश्वासाने व निर्धाराने पुन्हा आपला झेंडा विधानसभेवर फडकवायचा आहे. विरोधकांच्या घोषणा, भावनिक आवाहने आणि मतदारसंघातील वस्तुस्थिती याचे गावोगावी भांडाफोड करून त्या ठिकाणचे सत्य स्थानिक जनतेसमोर आणा. येणाऱ्या निवडणुकीत विजय आपलाच आहे त्यामुळे सकारात्मक राहून लोकांसमोर जावा. आपल्या सत्तेच्या काळातील सार्वत्रिक विकास आणि सध्या लोकांवर होणारा अन्याय दाखवून द्या. राज्यभर यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा गुरूवारी आपल्या मतदारसंघात येणार आहे. आपल्याला सार्वत्रिक ऊर्जा मिळण्यासाठी ही यात्रा प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी राज्य व जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी यावेळी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही सत्यजीतसिंह पाटणकर यांनी केले.
यावेळी राजाभाऊ शेलार, सुभाषराव पवार, राजाभाऊ काळे आदींची भाषणे झाली. स्वागत राजाभाऊ काळे यांनी व आभार गुरूदेव शेडगे यांनी मानले. यावेळी विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
फोटो – शिवस्वराज्य यात्रा नियोजन बैठकीत मार्गदर्शन करताना विक्रमसिंह पाटणकर सोबत सत्यजीतसिंह पाटणकर समोर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते.