पाटण : भाषिक राज्य निर्मीतीवेळी सीमा भागातील मराठी जनतेला राजकीय स्वार्थासाठी कर्नाटकच्या दावणीला बांधले. मातृभाषेच्या राज्यात जाण्यासाठी गेली 63 वर्षे मराठी भाषिकांचा लढा चाललेला आहे. कर्नाटक सरकार मराठी भाषिकांची चाललेली चळवळ दडपशाही व अत्याचाराचा मार्ग अवलंबून मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना मराठी भाषेतून विधानसभेत शपथ घेवू दिली जात नाही. कर्नाटकच्या जोखडातील सीमावासियांच्या मराठी भाषिक रस्त्यावरच्या लढाईला महाराष्ट्राने बळ द्यावे, अशी अपेक्षा सीमा भागातील मराठी लढ्याचे नेते व महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आमदार दिगंबर पाटील यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनात कै. भाई बाळासाहेब पाटणकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देताना ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष शंकरराव गोडसे, पुरूषोत्तम जाधव, स्वामी शिक्षण संस्थेचे सहसचिव अरविंद शेजवळ, प्राचार्य ए. वाय. मुल्ला, नितीन पाटील, शेखर मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गोडसे म्हणाले, आज स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही. एकेकाळी परराज्यातून मका आणि गहू आणून आपल्याला जगावे लागत होते. मात्र आज जगाच्या अन्नदात्याने मोठी क्रांती केली आहे. शेतकर्यांच्या शेतीला भाव मिळत नाही त्यामुळे बळीराज्याला आत्महत्त्या करावी लागत आहे. आपलीच माणसे शेतकर्याला पाताळात पाठवत आहेत. आज खर्याअर्थाने बळी राज्याचे राज्य आणायचे असेल तर क्रांतिसिंह नाना पाटील, भडकबाबा पाटणकर यांच्या कार्याचा झेंडा हाती घ्यावा लागणार आहे. निवडणुका जवळ आल्या की नेत्यांना शेतकर्यांची आठवण येते. बिस्लेरीचा दर वाढला आहे पण दुधाचा दर काही केल्या वाढत नाही. कांद्याच्या भावाची माती झाली. ज्यांच्या नावावर निवडून आलो त्यांना न्याय देण्याचे काम भवनात होत नाही. एकही नेता, एकही मंत्री शेतकर्यांच्या बाजूने बोलत नाही. त्यामुळे आता क्रांती सेनेचे कार्य हाती घ्यावे लागणार आहे. नेत्यांच्या सतरंज्या उचलायचे काम बंद केले पाहिजे. नीतिमत्ता राहिली नाही. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास युवकांच्यापुढे मांडणे गरजेचे आहे. चळवळीचे पावित्र्य राखले पाहिजे. शेतीला भाव नाही म्हणून युवक शेतीकडे वळत नाही. 66 टके युवक शेती करत नाही. आज न्यायासाठी लोकांना अर्धनग्न मोर्चा काढावा लागत आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. उसाला, दुधाला भाव नाही त्यामुळे आता हिशोबाच्या शेती करावी लागणार आहे. गहू, ज्वारी पिकवायचा कारखाना जगात कोठेही नाही. शेतकर्याने केवळ स्वतःपुरते पिकवायचे ठरविले तर नेतेमंडळी तुमच्या घरात पैसे घेऊन येतील. गावागावात अराजकीय संघटना मजबूत झाली पाहिजे. शेतकर्यांनी एकत्रित आले पाहिजे. क्रांती करायची असेल तर भडकबाबा पाटणकर यांच्या कार्याच्या पाठीशी ताकत उभी करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी दादासाहेब कदम यांचे भाषण झाले. अशोकराव देवकांत यांनी प्रास्ताविकात स्व. भडकबाबा पाटणकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. स्वागत विक्रमबाबा पाटणकर यांनी केले. सूत्रसंचालन ऍड. सौरभ देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास फतेसिंह पाटणकर, आयेशा सय्यद, संजय पाटील, सुरेश पाटील, ए. व्ही. देशपांडे, दिलीपराव पाटणकर, आबासाहेब भोळे, राजाभाऊ काळे यांच्यासह ग्रंथ, साहित्यप्रेमी, वाचक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कष्टाच्या घामातून ऊस पिकवणार्या शेतकर्यांच्या जीवावर कारखानदार विविध उत्पादनातून उसाच्या टनामागे साडेसात ते आठ हजार रुपये कमवत असतील तर शेतकर्यांना टनापाठीमागे 3 हजार 500 रुपये दर द्यायला यांच्या पोठात दुखण्याचं काय कारण नाही. उर्वरीत साडेतीन हजारात उत्सव अथवा वाढदिवस साजरा करा. पण शेतकर्याला सुखी करा. शेतकर्यांच्यासाठी मी 220 खटले अंगावर घेतले आहेत. येथून पुढेही शेतकर्यांवर अन्याय होत असेल तर माझ्याशी गाठ आहे, असा सज्जड दमही शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे यांनी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पाटणसह जिल्ह्यातील कारखानदारांना दिला.
कर्नाटक सीमावासियांच्या मराठी भाषिकांच्या लढाईला महाराष्ट्राने बळ द्यावे : आ.पाटील
RELATED ARTICLES