मेढा,ता. १९ : पारंपारीक सलुन व्यवसाय असणाऱ्या नाभिक समाज्याची सलुनची दुकाने सुरू व्हावीत ही आमची मागणी असली तरी प्रत्येक मनुष्याचे शाररीक आरोग्य स्वच्छ व चांगले राहणे, टिकणे यासाठी सलुन व्यवसाय आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असा महत्वपुर्ण आहे. हा सलुन व्यवसाय सुरूच करावा अशी मागणी जनमाणसातून मोठया प्रमाणात होत असल्याने याबाबत सकारात्मक विचार करून सलुन व्यवसायीक व ग्राहकांच्या आरोग्याची खबरदारी घेवून सलुन व्यवसाय सुरू करण्यास रितसर परवानगी द्यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने सातारा जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांनी जावळीचे तहसिलदार शरद पाटील यांना दिले.
यावेळी महामंडळाचे जावळी व महाबळेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र निकम, खजिनदार संजय गायकवाड, मेढा शहरप्रमुख सुर्यकांत निकम उपस्थित होते.या निवेदनात असे म्हटले आहे की सलुन व्यवसाय हा अत्यावश्यक सेवेत करणे आज गरजेचे झाले असून शासनाने तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तसेच ९० टक्के सलुन व्यवसायाचे हातावरचे पोट असून त्यांना शेतजमिन नाही. ९० टक्के दुकानेही भाडे तत्वावर आहेत.राज्यात सुमारे ३० लाख सलुन व्यवसायिक आहेत.त्यामुळे दुकानभाडे, वीज बील, भाड्याने राहत असलेल्या घराचे भाडे माफ करुन त्यांच्या कर्जाचे दीर्घकालीन व्याज माफ करावे . त्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करून तसेच प्रति महिना पाच हजार रूपये मदत स्वरूपाचे विशेष पॅकेज जाहीर करावे.
राज्यामध्ये शहरात व गावोगावी सलून व्यावसायिक प्रामाणिकपणे शासनाचे आदेश पाळत असताना मात्र अनेक ठिकाणी त्यांना दमदाटी, शिवीगाळ तसेच जातीवाचक तसेच मोठया रक्कमेची लालच दाखवून सलूनचे काम करून घेणारे काही महाठग व प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यामुळे नियम मोडणारे दोघेही असताना फक्त एकतर्फी सलुन कारागीरांवरच विविध पोलिस ठाण्यात गुन्ह: दाखल होतात हे दुदैर्वी असले तरी मग आपत्ती व्यवस्थापन कायदयाचे नियम सर्वांना सारखेच असल्याने सलुन कारागीरांना कामास फोर्स व प्रवृत्त करणाऱ्या विरूध्द गुन्हे दाखल व्हावेत.
तसेच राज्यात ग्रीन व ऑरेंज झोन असलेल्या ठिकाणी सलुन व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी. तसेच सलुन व्यावसायिक व ग्राहक यांच्यातील सोशल डिस्टन्सचा अभ्यास करून दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षा किट, आरोग्य विभागामार्फत प्रत्येक तालुका वाईज प्रशिक्षण देवून स्वच्छता सेवक असणाऱ्या सलुन धारकाला ३० लाखांचे विमा संरक्षण द्यावे. अशा मागणीचे निवेदन नाभिक महामंडळाचेराज्याचे अध्यक्ष कल्याण दळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहे.
प्रशासनाने विविध व्यवसाय व उद्योगांशी याची तुलना व नियमावली न करता
प्रत्येक मनुष्याच्या आरोग्याच्या दृष्टीने सलुनचे काम हे अत्यावश्यक असून वेळेत होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचे शरीर स्वच्छ राहून आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. म्हणून योग्य ती दक्षता घेवून सलुन व्यवसाय सुरू करावा :- विजय सपकाळ- सातारा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ