सातारा- सातारा शहरात कंटेन्मेंट झोन वगळून इतर ठिकाणची किरणा माल, भाजीपाला हि अत्यावश्यक दुकाने सुरु करण्यात आली आहेत. असे असले तरी गेले दीड महिन्यापासून बाजारपेठ बंद असल्याने आता लोकांची गैरसोय टाळण्यासाठी इलेक्ट्रिक, हार्डवेअर, मोबाईल आदी दुकाने सुरु करण्याची गरज आहे. शासने राज्यातील काही शहरांमध्ये ठराविक दिवस ठरवून इतरही दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. बाजारपेठ बंद ठेवणे हा काही पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे लोकांची आणि व्यावसायिकांची गरज ओळखून आणि गर्दी टाळण्यासाठी सातारा शहरातील इतर आवश्यक दुकाने ठराविक दिवस ठरवून सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड महिन्यांपासून लॉक डाऊन सुरु आहे. त्यातच सातारा शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण शहर आणि आजूबाजूची गावे १०० टक्के लॉक डाऊन केली होती. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार कंटेन्मेंट झोन वगळून किराणा, भाजीपाला हि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली. दरम्यान गेल्या दीड महिन्यापासून लॉक डाऊनमुळे बाजरपेठ बंद असल्याने दुकाने बंद आहेत आणि त्यामुळे अर्थवयवस्था ठप्प झाली असून दुकानात काम करणारे कामगार, महिला यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. याशिवाय लोकांनाही आता इतर दैनंदिन गरजेच्या इतर वस्तूंची गरज भासत आहे. त्यामुळे कोरणापासून बचावासाठीचे निकष पाळून राज्य शासनाने ज्या पद्धतीने लातूर, कोल्हापूर आदी शहरात ठराविक दिवस नेमून इतर आवश्यक दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली त्याच पद्धतीने सातारा शहरातील दुकाने दिवस ठरवून देऊन सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कराड दौऱ्यावर आलेले विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्याकडे केली आहे. याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी डॉ. म्हैसेकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला आणि चर्चा केली.
बाजारपेठ बंद ठेवणे हा काही आता पर्याय राहिलेला नाही. दीड महिन्यापासून दुकाने बंद असल्याने अर्थव्यवस्था आणि जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. व्यवसायिकांचेही मोठे नुकसान झाले असून अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. लोकांनाही आता इलेकट्रीक, इलेकट्रोनिक, हार्डवेअर, कपडे, भांडी, क्रोकरी आणि मोबाईलशी निगडित वस्तू अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंची गरज भासू लागली आहे. राज्यातील मोठ्या शहरात दिवस ठरवून इतर दुकाने सुरु केली जात आहेत, सातारा तर छोटे शहर असून केवळ दोन रस्त्यांची बाजारपेठ आहे. त्यामुळे ठराविक दिवस ठरवून देऊन लोकांसाठी आवश्यक असणारी दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, असे आ. शिवेंद्रसिंहराजे डॉ. म्हैसेकर यांना म्हणाले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन नागरिकांची गैरसोय दूर करू, असे डॉ. म्हैसेकर यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे याना सांगितले आहे. त्यामुळे सातारा शहरातील बाजारपेठेतील इतर दुकानेही ठराविक दिवशी उघडली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखूनच प्रशासनाने दिलेल्या निकषांचे काटेकोर पालन केले पाहिजे. दुकाने सुरु झाल्यास सोशल डिस्टंसिंग पाळून मास्क व सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. तसेच गरज असल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. दुकाने उघडलीत म्हणून चला शहरात फेर फटका मारू, असे प्रकार कोणीही करू नयेत. कोरोनाला हद्दपार कारण्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जनतेला केले आहे.