Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीवाशिम जिल्ह्यातील उपाययोजनांचा पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा ; लॉकडाऊन...

वाशिम जिल्ह्यातील उपाययोजनांचा पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा ; लॉकडाऊन काळात जनतेच्या हिताकरीता प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सुचना.

 सातारा दि.१६ राज्याचे गृहराज्यमंत्री व वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज सातारा जिल्हयाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लॉकडाऊन काळातील वाशिम जिल्हयातील उपाययोजनां संदर्भात सर्व शासकीय जिल्हास्तरीय अधिकारी यांचा आढावा घेतला.केंद्र शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा होईल,यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच रास्तभाव दुकानांमधून वितरीत होणाऱ्या अन्नधान्य वितरणाची कार्यवाही अधिक गतीने करून प्रत्येक पात्र व्यक्तीला धान्य मिळेल, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी आढावा बैठकीत दिल्या.

          लॉकडाऊन परिस्थितीत वाशिमला जाणे शक्य नसल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी करावयाच्या व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर,जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार आदी सहभागी झाले होते.

           यावेळी वाशिम जिल्ह्यात आपल्या वेळोवेळीच्या सुचनानुसार कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ५० बेडचा आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे. तसेच कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींवर उपचारासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर कोविद केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. या ६ सेंटरची एकूण क्षमता ५०० बेड ठेवण्यात येणार आहे. आपले आदेशानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या १ कोटी रुपयांमधून पीपीई कीट,मास्क, व्हेंटीलेटर्स खरेदी करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी यावेळी सांगत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची यावेळी माहिती दिली.

             तसेच जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.तसेच चेकपोस्टद्वारे तपासणी सुद्धा करण्यात येत आहे.संचारबंदीचे उल्लंघन करुन विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत असून त्यांची वाहने सुद्धा जप्त केली जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी फिरताना चेहऱ्यावर मास्क,रुमाल,गमछा न बांधणाऱ्या व्यक्तींवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक परदेशी यांनी यावेळी दिली.

              यावेळी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असल्याने जिल्ह्यात यापुढे सुद्धा संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची खबरदारी घ्यावी.जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना परवानगीशिवाय प्रवेश देवू नये, मुंबई, पुणे शहरातून वाशिमकडे येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असून त्यांची अडवणूक करण्याकरीता औरंगाबाद, जालना, बुलढाणा जिल्हयाच्या हद्दीवर चेकपोस्ट करण्याची विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली आहे त्यानुसार त्यावर कार्यवाही करण्यात येईल असे सांगून त्यांनी विविध योजनांतर्गत करण्यात येणाऱ्या धान्य वाटपाची कार्यवाही अधिक गतीने होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याच्या हिस्स्याचे धान्य मिळेल,यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी योग्य नियोजन करुन त्याबाबतचा वेळोवेळी आढावा घ्यावा.धान्य वाटपाबाबत तक्रारी आल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करावी,त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु ठेवून लोकांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात. आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधी साठा उपलब्ध करुन दयावा अशा सुचनाही ना.देसाईंनी यावेळी दिल्या.

  जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांनीही स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या. — ना.देसाई.

              कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक त्या उपाययोजना जिल्हयामध्ये राबविताना जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांनी जनतेच्या काळजीबरोबर स्वत:च्याही आरोग्याची काळजी घेवून काम करावे. वाशिम जिल्हयातील सर्व अधिकाऱ्यांचे काम उत्कृष्ट असून जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली टीमवर्क करुन चांगल्या प्रकारे कोरोनावर वाशिम जिल्हयाने प्रतिबंध केला आहे ही कौतुकास्पद बाब आहे. असेही ना.देसाई म्हणाले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular