औंध(वार्ताहर): – खटाव तालुक्यातील हरणाई सूतगिरणी व माण तालुक्यातील प्रबोधनकार मागासवर्गीय सूतगिरणी प्रकल्प मोठ्या संघर्षातून उभे करत शेकडो हातांना रोजगार मिळवून दिला आहे.आज या दोन्ही प्रकल्पांनी मोठे यश मिळवले आहे.या प्रकल्पानंतर स्व. दादांचे ( धैर्यशील देशमुख ) स्वप्न साकारण्यासाठी व दुष्काळी भागातल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी माण तालुक्यात शुगर ग्रीन हा पहिला साखर कारखाना उभारला जात असून दसऱ्याच्या शुभमूहुर्तावर याची पायाभरणी केली जाणार असल्याचे प्रतिपादन सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख (भैय्या) यांनी केले आहे.
पिंगळी बु.ता.माण येथील प्रबोधनकार मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रणजितसिंह देशमुख म्हणाले , आजपर्यंत अनेक राजकारण्यांनी फक्त विकासाच्या गप्पा मारत जनतेला फसवण्याचे उद्योग केले आहेत. सूतगिरणीच्या दोन्ही प्रकल्पांची उभारणी करताना अनेकांनी अनंत अडचणी निर्माण केल्या.पण यावर मात करत आज दोन्ही प्रकल्प नावारूपाला आणले आहेत.
हरणाई सूतगिरणीवर आज एक रूपयांचेही कर्ज नाही.माण- खटावमध्ये सव्वापाच लाख टन उसाचे उत्पादन काढले जाते. माण-खटावच्या जनतेसाठी शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाचे आशीर्वाद घेऊन हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्धार केला होता. त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने लवकरच कारखाना सुरू होणार आहे .हा कारखाना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त राहणार असून यातून सल्फरलेस साखर काढण्यात येणार आहे. राज्यातला एक आदर्श कारखाना उभारण्याचे ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवले आहे.दसऱ्याला शुभारंभ झाल्यानंतर नऊ महिन्यात हा कारखाना सुरू होणार आहे. कारखान्याचे शेअर्स जमा करण्यास प्रारंभ झाला असून ऊसउत्पादक शेतकऱ्यांसह इतरांनीही शेअर्स घ्यावेत असे आवाहनही रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे.
पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी या जिहे-कटापूर योजना मार्गी लावण्यासाठी लक्ष घातले असून चार- पाच महिन्यात जिहे कटापूरचे पाणी नेर धरणात सोडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दुसऱ्या टप्प्यात आंधळी बोगद्याचे काम चालू होणार आहे. कमीतकमी १ वर्षात हे पाणी मिळू शकते. याचा लाभ माणच्या उत्तरेकडील गावांनाही होऊ शकतो.
यावेळी माण तालुक्याचे जेष्ठ पत्रकार बापूसाहेब गुंजवटे यांना माणदेश जीवनगौरव पुरस्कार व पत्रकार नवनाथ जगदाळे यांना आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेेळी सूतगिरणीचे संचालक , आदी मान्यवर ,माण-खटावचे शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
– माण तालुक्यात पिंगळी बु. येथे पहिला साखर कारखाना सुरू होत असून हा खाजगी असला तरी उसउत्पादक शेतकऱ्यांसह इतरांचेही शेअर्स स्विकारले जाणार आहेत. शेअर्स रक्कम कमीतकमी १० हजार रूपये असून इच्छुकांनी या कारखान्याचे शेअर्स घ्यावेत असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.