सातारा : स्वाईन फिव्हरमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असताना पालिकेचा आरोग्य विभाग झाडून कामाला लागला आहे. स्वाईनमुळे ज्या भागातील नागरिकांना जीव गमवावा लागला, त्या भागात जाऊन नगराध्यक्षा माधवी कदम यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी डॉ. रश्मी थोरात आणि टीम उपस्थित होती.
शहरातील बुधवार पेठ, मल्हार पेठ, मंगळवार पेठेत स्वाईनमुळे जीव गमवावा लागलेल्या आणि स्वाईनच्या विळख्यात अडकलेल्या रुग्ण आणि नातेवाईकांशी नगराध्यक्षा माधवी कदम यांनी थेट संवाद साधला. यावेळी त्या ठिकाणी पालिकेने गेल्या पंधरा दिवसात कोण-कोणती कामे केली, त्याचा आढावा नागरिकांकडून जाणून घेतला. यावेळी नागरिकांनी केलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी पुढील पांढरा दिवसात ठोस कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन कदम यांनी दिले. शहरातील कुंड्या साफ करताना घंटा गाड्या आणि पालिका यंत्रणेद्वारे साफसफाई वेगाने केली जात असून नागरिकांनी आपल्या तक्रारी अप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नगरसेवक अण्णा लेवे, सुनीता पवार उपस्थित होत्या. सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांची माहीती घेत सैनिक स्कूल प्रशासनाशी संवाद कदम यांनी संवाद साधत करण्यात येणार्या उपाय योजनांबाबत माहीती घेतली. यावेळी अमर जाधव उपस्थित होते.
वीज पडल्याने केसरकर पेठेतील साथ कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त नागरिकांनी नगराध्यक्षा सौ. कदम यांच्याकडे गार्हाणी मांडली. तदनंतर महसूलच्यावतीने पंचनामा न झाल्याने तलाठी तारळेकर यांना नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याची सूचना नगराध्यक्षांनी केली. शीला अवघडे, अनिता पाटोळे, मालती उत्तरकार, शोभा गायकवाड, कुसुम गवळी अशोक भोसले आणि गोपी देटके यांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाली असून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याने नागरिक हतबल झाले आहेत. यावेळी समाजकल्याण सभापती अनिता घोरपडे उपस्थित होत्या.