Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीसातार्‍यात शासकीय यंत्रणा सतर्क असूनही टँकर लॉबी घेत आहे हात धुवून

सातार्‍यात शासकीय यंत्रणा सतर्क असूनही टँकर लॉबी घेत आहे हात धुवून

सातारा (अजित जगताप) : सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून एप्रिल महिन्याच्या अखेर तापमानामध्येही कमालीची वाढ झालेली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी खोलवर जात असून जिल्हा प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा करण्याचा विडा उचलला आहे. ही कौतुकस्पद बाब असली तरी, शासकीय यंत्रणा सतर्क असूनही टँकर लॉबी हात धुवून घेत आहे. राजकीय व प्रशासकीय हितसंबंध जपणार्‍या टँकर माखियांना आता ग्रामस्थांनीच हिसका दाखवावा अशी मागणी सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील महिला वर्ग, वयोवृद्ध करू लागलेले आहेत.
सातारा जिल्ह्याला दुष्काळ हा नवीन नाही. गेली दहा वर्षापासून दर उन्हाळ्यात माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा, जावळी, महाबळेश्‍वर, पाटण तालुक्यातील सुमारे 165 गावे, 730 वाड्या वस्तींना शासकीय व खाजगी सुमारे 35 टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जातो. तसेच पाळीव जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही सोडविण्याची कसरत जिल्हा प्रशासनाला करावी लागते. काही ठिकाणी वेळेत पाण्याचा टँकर पोहचत नसल्यामुळे भटक्या समाजातील ग्रामस्थानंा पिण्याच्या पाण्याचा शोध घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बर्‍याच वेळेला गावातील टगे मंडळी राजकीय व प्रशासकीय ओळखीचा फायदा घेवून आपल्या बगलबच्चांना मुबलक प्रमाणात पाण्याच्या टँकरचा वापर करून देतात. त्यामुळे पुढील गावे व वाड्या वस्तींना वेळेत पाणी पोहच करणे अशक्य झालेले आहे. ज्या सार्वजनिक ठिकाणामधून पाणी पुरवठा केला जातो त्याठिकाणी सद्धा पाण्याची पातळी कमी होत असल्याने खाजगी विहीरी अधीग्रहण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भटक्या जाती-जमातीच्या वाड्या वस्तीत रोजगारीमुळे अनेकजण आपल्या झोपडी वजा घरातून दिवसभर बाहेर असतात. त्यांच्यासाठी संध्याकाळी किंवा रात्री पाण्याच्या टँकरची सोयी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज माने, यशवंत वैदु यांनी केली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या सोशल मिडियामुळे दुष्काळग्रस्थ ग्रामस्थ जागरूक झाले असले तरी, अनेक ठिकाणी मोबाईलला रेंज नसल्यामुळे संपर्क होत नाही. तर काही वेळेला खंडित वीज पुरवठ्यामुळे मोबाईलची बॅटरी चार्ज करता येत नाही. याचाच फायदा टँकर फेरी वाढवण्यासाठी केला जात आहे. या पाण्याच्या नमुन्याची तपासणी केल्याचा दावा आरोग्य खात्याकडून केला जात असला तरी, या पाण्यामध्ये काही प्रमाणात जादा क्षार तसेच शेवाळ सुद्धा पाण्यासोबत येत आहे. ही बाब आरोग्याच्या दृष्टीने घातक असली तरी, प्रशासकीय हलगर्जीपणामुळे कालचा रिपोर्ट आज फॉरवर्ड केला जात आहे. अशा तक्रारी वाढू लागलेल्या आहेत. याची गंभीर दखल घेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे हे स्वत: काही ठिकाणी भेट देवून वस्तुस्थितीची तपासणी करीत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसू लागला आहे.
सध्या सातारा जिल्ह्यात सतराव्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी थांबलेली आहे. आता दुष्काळी भागात निवडणूक आयोगाच्या निरिक्षकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अशी मागणी केल्याने आचार संहिता उठविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणा दुष्काळी भागासाठी कामी लावावी त्यामुळे मतदारांना खर्‍या अर्थाने दिलासा मिळणार आहे. शहरी भागात ही अशीच परिस्थिती असून अनेकांना आता पाण्याचे महत्व कळू लागले आहे. निवडणूकीच्या काळात काही लोकप्रतिनिधी मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करतात. पण यंदाच्या वर्षी अद्याप ही कोणीही पाणी पुरवठा मोफत करण्याची जबाबदारी स्विकारलेली नाही. याचे सर्वत्र आश्‍चर्य वाटत आहे. शासकीय यंत्रणेने ग्रामस्थांना वेळेत पाणी पुरवठा होण्यासाठी दक्ष राहिले पाहिजे. कारण, पाणी हे जीवन आहे. त्याठिकाणी भ्रष्टाचार होऊ नये, अशी अपेक्षा आहे. या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष घालत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular