वडूज: मायणी परिसरातील गावांच्या पाण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या टेंभू योजनेच्या कामाची मुदत सहा महिन्यांची आहे. मात्र प्रत्यक्षात तीन महिन्यांतच टेंभूचे पाणी मायणी तलावात पोहोचेल असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केला.
मायणी (ता.खटाव) येथे येथील ब्रिटीश कालीन धरणात टेंभू योजनेचे पाणी कामाचा शुभारंभ तसेच विविध रस्त्यांच्या कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख,पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, खासदार संजय पाटील, शेखर चरेगावकर, पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, डॉ. दिलीप येळगावकर, विक्रम पावसकर, अनिल देसाई, मनोज घोरपडे, सरपंच सचिन गुदगे, तालुकाध्यक्ष विकल्प शहा, शिवाजीराव शिंदे, मेघा पुकळे, बाळासाहेब मासाळ, बाळासाहेब खाडे, सुभेदार वसंतराव घाडगे, सोमनाथ माळी, अॅड. हणमंतराव जाधव, सौ. उर्मिला येळगावकर, सौ. निता गुदगे, अॅड. अनिता पवार, सौ. किशोरी पाटील, अनिल माळी, वचन शहा, जालींदर माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री महाजन म्हणाले, सरकारने महत्वकांक्षी पाऊले उचलून राज्यातील शेती पाण्याची समस्या सोडविण्यासाठी गतीने कामे सुरू केली आहे. सिंचन योजना असणार्या भागांतील प्रत्येक शेतकर्याच्या बांधावर पाणी पोहोचविण्यात येणार आहे. खटाव माण तालुक्यांचा दुष्काळ कायम स्वरूपी हटविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत.
मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील रस्ते, पाणी आदी मूलभूत सुविधांची कामे सद्या गतीने सुरू आहेत. केंद्र व राज्य सरकार राज्याचा विकासात्मक कायापालट घडविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. विरोधकांकडे विकासाचा कोणताही मुद्दा नसल्याने भाजपावर टिकाटिप्पणी केली जात आहे. या टिकाटिप्पणीकडे लक्ष न देता आमचे विकासात्मक काम सुरूच राहील. दुष्काळी खटाव माणचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत.
सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, राज्यातील शेतकरी वर्गाच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे.
डॉ. येळगावकर म्हणाले, खटाव माण तालुक्यांना वरदान ठरणार्या उरमोडी, जिहे- कठापूर, टेंभू या योजनांची कामे केवळ भाजपा शासनाच्या काळात मार्गी लागू शकतात असा विश्वास येथील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर कुणीही विरोधकांनी स्वत:ची टिमकी वाजवू नये.
यावेळी मंत्री जानकर, खासदार पाटील, श्री. देसाई यांचीही भाषणे झाली.
सरपंच सचिन गुदगे यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच सुरज पाटील यांनी आभार मानले.