म्हसवड : टेंभू योजनेच्या पाण्यासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई यांनी लढा उभारुन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांच्या माध्यमातून अशक्य असे काम पूर्ण केले. टेंभू योजनेचे पाणी माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडीत आल्याने या भागातील दुष्काळी जनता आनंदली आहे. या पाण्याचे पूजन शनिवारी करण्यात आले.
माण तालुका हा दुष्काळ हे जणू समीकरणच होते. मात्र माणच्या राजकारणात जिल्हा बँकचे संचालक तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी लक्ष घालायला सुरुवात केल्यापासून माण तालुक्यातील जनतेला आपला माणूस मिळाल्याची भावना झाली आहे. तालुक्यातील गावे, वाड्यावस्त्यांची खडान्खडा माहिती असणारा, आपली सुख : दु:खे जाणणारा आपला माणूस मिळाल्याची भावना तालुक्यातील जनतेची झाली आहे. विशेषत: टेंभू योजनेसाठी प्रसंगी संघर्ष करुन अशक्यप्राय असे काम अनिल देसाई यांनी करुन माणच्या जनतेला आशेचा नवा किरण दाखवल्याच्या प्रतिक्रिया माणदेशी जनतेतून व्यक्त होताना दिसत आहेत.
निवृत्त पोलिस उपअधिक्षक दत्तात्रय सोनावणे म्हणाले, कोणतेही काम करत असताना संघर्षाबरोबर प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. अनिल देसाई यांच्याकडे दोन्ही गोष्टी आहेत. याशिवाय त्यांच्या संघर्ष आणि इच्छाशक्तीला ना. देेवेंद्र फडणवीस आणि ना. चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पाठबळ मिळाल्याने आज माणमधील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
जालिंदर खरात म्हणाले, अनिलभाऊ देसाई यांची माणच्या जनतेसाठी नेहमी तळमळ दिसून येते. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता मला फक्त माणच्या जनतेला पाणी द्यायचे आहे, हे ध्येय घेवून ते समाजकारण करत आहेत. भाजप सरकारनेही त्यांना खर्या अर्थाने ताकद देण्याचे काम केल्याचे दिसत आहे. आगामी काळातही त्यांच्याकडून तालुक्यातील अनेक विकासात्मक कामे मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाबळेश्वरवाडीत पाणी आल्यानंतर शनिवारी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुवर्णाताई देसाई, बनगरवाडीच्या सरपंच रंजनाताई बनगर, सौ. लताताई सोनावणे, अश्विनी कोरडे, उषाताई जगताप, जयश्री कोठावळे, इंदूबाई जेडगे, मीना काटकर यांच्यासह परिसरातील महिलांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई, वरकुटे मलवडीचे माजी सरपंच बाळासाहेब जगताप, निवृत्त पोलिस उपअधिक्षक दत्तात्रय सोनावणे, वरकुटेचे माजी सरपंच जालिंदर खरात, महाबळेश्वरवाडीचे सरपंच अंकुश गाढवे, बनगरवाडीचे सुरेश बनगर, शेनवडीचे सरपंच मोहन कदम, काळचौंडीचे उपसरपंच यशवंत माने, चंद्रकांत कोठावळे, विजय कोरडे, वैभव शिंगाडे, सुभाष जगताप, अरुण वणवे, शंाताराम जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनिल देसाई यांच्यासह 5 सरपंचांच्या हस्ते नारळ फोडून पाण्याचे पूजन करण्यात आले.
दरम्यान माण तालुक्याच्या दुष्काळी भागात पाणी आल्याने या भागातील जनता आनंदली असल्याचे दिसत आहे.
ना. फडणवीस, ना. चंद्रकांतदादांमुळे
दुष्काळाचा कलंक पुसण्यात यश : अनिल देसाई
टेंभू योजनेचे पाणी माण तालुक्याच्या दुष्काळी भागात आणण्यासाठी 16 वर्षे संघर्ष केला. येथील जनतेला बरोबर घेवून अनेकदा आंदोलनाचे हत्यार उपासावे लागले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री ना. चंद्रकातदादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी या योजनेच्या कामाला गती दिली. खर्या अर्थाने त्यांनी दुष्काळी जनतेचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. संपूर्ण तालुक्याचा दुष्काळ भाजपा सरकारच्या माध्यमातून हटवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणार असल्याची माहिती यावेळी अनिल देसाई यांनी दिली.
टेंभूच्या पाण्याचे महाबळेश्वरवाडीत जलपूजन अनिल देसाईंच्या प्रयत्नांना यश : दुष्काळी जनता आनंदली
RELATED ARTICLES