साताराः छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सकल महाराष्ट्राचेच नव्हे तर या भारत देशाचे आराध्य दैवत. महाराष्ट्राची आणि प्रत्येक मराठी मनाची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींचा गोवा राज्यातील साखळी या नगरपालिकेकडून भर चौकातील पुतळा हटवण्यात आला आहे.
या कृत्याचा तिव्र निषेध करतानाच ही अत्यंत खेदाची आणि चिंतेची बाब असल्याचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले असून गोवा सरकारने साखळी येथील शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी पुर्ण मानसन्मानाने पुर्ववत स्थानापन्न करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.
साखळी ता. सत्तारी जि. उत्तर गोवा येथील भर चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा साखळी नगरपालिकेने बेकायदेशीर ठरवून हटवला. या कृत्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे तिव्र निषेध व्यक्त केला आहे. संपुर्ण देशभरात असंख्य पुतळे आहेत. मात्र त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळेच कसे बेकायदेशीर वाटतात, असा खेदजनक सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला असून शिवपुतळा हटवण्यामागे नेकमा काय हेतू आहे, हेच समजत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ना भुतो, ना भविष्यती असे आदर्शदायी व्यक्तीमत्व असलेल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील सर्वांनाच प्रेरणादायी आहे.
शिवछत्रपती म्हणजे तमाम मराठी जनांची अस्मिता आणि प्रतिष्ठा आहे. असे असताना भर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गोवा राज्यातील एका नगरपालिकेने हटवावा, ही अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी बाब आहे.
साखळी नगर पालिकेकडून अक्षम्य अशी चूक झाली असून यामुळे शिवछत्रपतींचा घोर अवमान झालेला आहे. गोवा सरकारने ही बाब गांभिर्याने घेवून तातडीने साखळी येथील चौकात पुतळा होता त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा पुर्ण मानसन्मानाने पुर्ववत बसवावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
गोवा येथील शिवपुतळा पुर्ववत स्थानापन्न कराः आ. शिवेंद्रसिंहराजे ; छत्रपतींचा पुतळा हटवण्यामागचा हेतू तरी काय?
RELATED ARTICLES