फलटण : फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील दिंगबर आगवणे यांच्या आयुर ट्रेडर्सच्या या कंपनीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत लाकूड, पाचट, बायोमास ब्रिकेट, अनेक मोठी वाहने या आगीत जळून खाक झाली असून या लागलेल्या आगीत अंदाजे 14 कोटी रुपये रुपयांचे नुकसान झाले.
वाठार निंबाळकर या गावाच्या हद्दीत फलटण ते पुसेगाव रस्त्यावर पूर्व बाजूस स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर रोहिदास आगवणे व सौ जयश्री दिगंबर आगवणे यांची आयुर ट्रेडर्स ही कंपनी आहे. गट नंबर 249,250, 251, 252 या कंपनीच्या 20 एकर जागेत लाकूड, बगैस, प्रेसमड, पाचट, लाकडाचा भुसा, ब्रिकेट बायोमास ब्रिकेटचा उद्योग आहे. या जागेतून तीन ठिकाणाहून महावितरणच्या लघुदाब व उच्चदाब वीजवाहक तारा गेल्या आहेत. मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटने ठिणग्या उडून आग लागली असे त्या ठिकाणी कामावर असणाऱ्या सुरक्षा कर्मचारी यांनी सांगितले. रात्रभर जास्त वारे असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि ही लागेलेली आग प्रचंड वेगाने पसरली. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही. आग विझवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा घटनास्थळी होती परंतु आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की त्यामध्ये पाण्याचे पाईपलाईन ही जळून भस्मसात झाली.आग इतकी भीषण होती की सुमारे 10 ते 12 किलोमीटर आगीचे प्रचंड लोट दिसत होते.
फलटण नगरपालिकेचा अग्निशमन ही घटनास्थळी आला मात्र तोपर्यंत आग वेगाने पसरून सर्व जळून खाक झाले. या आगीत चार ट्ँक्टर, दोन ट्रक, एक टेम्पो, टँकर जळून खाक झाले. आगीत अंदाजे 14 कोटींचे नुकसान झालेचा अंदाज आहे. रात्रीची वेळी आग लागल्याने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी महसूल विभाग, पोलीस व महावितरण यांनी पंचनामे केले आहेत. घटनास्थळी कृष्णा खोरेचे माजी उपाध्यक्ष रणजिसिंह नाईक- निंबाळकर, वीज वितरण कंपनीचे अधिकारी राजदीप, तहसीलदार विजय पाटील, तलाठी, मंडलाधिकारी व महसूल अधिकारी, पोलीस, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भेट दिली.
अनेकांना मदत करणारे दिंगबर आगवणेना आता कोण मदत करणार?
फलटण तालुक्यात सामाजिक,राजकीय क्षेञात गेली ७ ते ८ वर्ष काम करीत असलेल्या दिंगबर आगवणे यांनी अनेक गरीब व गरजु लोकांना मदतीचा हात दिला मग ती दुष्काळात मोफत पाणी वाटप असो ,आवकाळी वादळ वा-यात संसाराचे नुकसान असो की कोणाच्या दवाखान्यासाठी मदत असो दिंगबर आगवणे कायम लोकांच्या मदतीला धावुन गेले पण अनेकांना मदत करणारे दिंगबर आगवणेना आता कोण मदतीला कोण कोण येणार हा खरा प्रश्न आहे.