सातारा: एखाद्या प्रश्नावर जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकजण आंदोलन करतात. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्षभर आंदोलकांची विविधप्रश्नी आंदोलकांची मांदियाळी असते. या आंदोलकांना दिवसरात्र साथ देणारे आंदोलकही आहेत. या आंदोलकांना आता पत्रकार, बंदोबस्तासाठी असलेले पोलीस व इतर आंदोलकांशी यांची चांगलीच गट्टी निर्माण झाली आहे.
अडीच वर्षापूर्वी स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांच्या प्रश्नाबाबत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकवेळा निवेदने देवूनही प्रश्न सुटत नव्हते. त्यामुळे अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. तिरंगा एअरलाईन्स विमानतळ माहुली येथील शासकीय जागेत व्हावे, स्वातंत्र्यसैनिक संग्राम व संकल्प गृहनिर्माण संस्थेला जागा मिळावी, राजमाता जिजाऊ स्मारक उद्यान करंजे तर्फ सातारा येथे व्हावे व तत्सम विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. या आंदोलनासाठी हर्षदा शेडगे, कृष्णात शेवते, सुदाम जगदाळे, दिनकर शेडगे हे दररोज या आंदोलनात सहभागी होत आहेत. सकाळी 6 वाजून 15 मिनिटाने राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकावून या आंदोलनाचा दिवस सुरु होतो. त्यानंतर सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटाने हा तिरंगा शासकीय वेळेप्रमाणे उतरविण्यात येतो. विशेष म्हणजे या ध्वजाच्या खांबाला किंवा आजुबाजूला कोणालाही वाहन लावून दिले जात नाही. काही व्यक्तींनी विरोध केला, तर त्याला त्याच्याच भाषेत समजावले जाते. अशा या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे त्या परिसरात होणार्या इतर आंदोलकांना आता या आंदोलकांची साथ लाभत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी नवख्या आंदोलकांना निवारा देणे, त्यांची काळजी घेणे, असेही समाजोपयोगी काम अडीच वर्षे हे आंदोलक अहोरात्र करीत आहेत.
याठिकाणी आंदोलकांचे हितचिंतक, नातेवाईक तसेच छायाचित्रकार, पत्रकार आणि बंदोबस्तासाठी असलेले पोलीससुद्धा याठिकाणी निवांतवेळी बसलेले पहावयास मिळतात. गेट वे ऑफ इंडियाच्या ऐतिहासिक वास्तूसमोर जशापद्धतीने काहीजण दृष्टीस पडतात, तद्वतच आंदोलकांचे सेवाभावीपणे फोटो काढण्यासाठी व बातमी तयार करण्यासाठी याठिकाणी काही व्यक्ती हमखास भेट देतात. त्यांच्यामुळे उशीरा आलेल्या काही पत्रकारांना फोटो व बातमी उपलब्ध होत असल्याने एकप्रकारे ते संपर्क कार्यालयच बनले आहे. या आंदोलकांच्या मागण्यांबाबत जिल्हा प्रशासनाने अद्यापही तोडगा काढलेला नाही. याचा फायदा इतर आंदोलकांना होत असल्यामुळे या आंदोलकांना आता अडीच वर्षाच्या आंदोलकांची साथ मोलाची ठरु लागली आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता गेली अडीच वर्षे आंदोलन करीत असलेल्या या आंदोलकांमुळे इतर आंदोलकांना प्रेरणा मिळू लागली आहे. यापूर्वी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक कृष्णराव फाळके यांनी रेकॉर्डब्रेक आंदोलन केले होते. त्यानंतर या अडीच वर्षाच्या आंदोलनाची चर्चा जिल्हा प्रशासनामध्ये होत आहे.
सातार्यात अडीच वर्षे विविध आंदोलकांना दिवसरात्र साथ देणारे असेही आंदोलक
RELATED ARTICLES