Monday, February 23, 2026
Homeठळक घडामोडी...तर टोलबंद करण्यासाठी रस्त्यावर उतरणार

…तर टोलबंद करण्यासाठी रस्त्यावर उतरणार

सातारा : सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांमुळे दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दरवर्षीची ही परिस्थिती असून टोल विरोधी सातारी जनता या सामाजिक समुहाने आधी रस्त्यांची दुरुस्ती मग टोल वसुली ही घेतलेली भुमिका योग्य आहे. टोल वसुली नेमकी कशासाठी आहे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधीत ठेकेदार यांनी येत्या 10 दिवसांत सातारा- पुणे महामार्गाची दुरुस्ती करावी आणि वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवावे. अन्यथा अकराव्या दिवशी टोलबंद करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा गर्भित इशारा आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गाची दरवर्षी खड्डयांमुळे चाळण झालेली असते. मोठमोठ्या खडड्यांमुळे दररोज छोटे- मोठे अपघात घडत आहेत. यामध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो तर, अनेक जण कायमचे जायबंदी होत आहेत. लोकांच्या जीवाशी खेळ सुरु असून जीवीत व वित्त हानी होत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण डोळ्यावर पट्टी बांधुन बघ्याची भुमिका घेत आहे. प्राधिकरणाने नेमलेल्या ठेकेदारास तर लोकांच्या जीवाचे काहीही देणेघेणे राहिले नसल्याचे स्पष्ट होत आहे. दळणवळणासाठी दर्जेदार महामार्ग असावा, वाहनचालक आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी टोलवसुली आहे, का ठेकेदाराचे इमले उभे करण्यासाठी टोल वसुली आहे, हेच कळेनासे झाले आहे. सातारा- पुणे महामार्गावर सातत्याने खड्डे पडत आहेत. जनतेमधुन संतापाची लाट उभी राहिली की तेवढ्या पुरती मलमपट्टी होते. पुन्हा पहिले पाडे पंचावन्न.
आतामात्र हद्द झाली आहे. कुंभकर्णी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स ठेकेदार यांना वठणीवर आणणे आवश्यक बनले आहे. टोल विरोधी सातारी जनता या सामाजिक समुहाने योग्य भुमिका घेतली असून आधी सुविधा द्या मगच टोल वसुली करा, हे रास्तच आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स ठेकेदार यांनी सातारा हद्दीतील महामार्गाची दुरुस्ती करावी आणि प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत. अन्यथा अकराव्या दिवशी आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन छेडले जाईल असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

टोलमुक्त सातार्‍यासाठी ना. गडकरींना भेटणार
आनेवाडी व परिसरातील गावकर्‍यांसह महामार्गालगत असलेल्या सातारा तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी गेल्या आहेत. असे असताना आनेवाडी टोल बुथवर या भुमिपुत्रांनाही टोलसाठी अरेरावी आणि दमदाटीचे प्रकार सुरु असतात. सातारा शहर आणि सातारा व जावली तालुक्यातील नजीकच्या गावांमधील लोकांना कामानिमीत्त, समारंभानिमीत्त भुईंज, पाचवड, वाई, जोशी विहीर, सुरुर आदी ठिकाणी सातत्याने ये-जा करावी लागते. त्यांनाही टोल द्यावा लागतो. भुमिपुत्रांच्या जमिनी घेवून त्यांच्याकडूनही सक्तीने टोलवसुली केली जाते. ही बाब अन्यायकारक आहे. त्यामुळे लवकरच रस्ते आणि भूपृष्ठवहन खात्याचे मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेणार असून सातारा व जावली तालुक्यातील महामार्गालगतच्या गावातील वाहनचालकांना टोल आकारु नये याबाबत चर्चा करुन सातारा टोलमुक्त करणार असल्याचेही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular