Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीग्रामीण भागाचे हित जोपासणे हेच राष्ट्रवादीचे धोरण

ग्रामीण भागाचे हित जोपासणे हेच राष्ट्रवादीचे धोरण

मेढा : गोर गरिबांचे तारणहार व सर्वसामान्य शेतकर्‍याचे प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणून शरद पवारांची ओळख आहे, ग्रामीण भागाचे हित जोपासणे हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धोरण आहे. त्यामुळे पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना निवडून द्या, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, आरपीआय (गवई गट), आरपीआय (कवाडे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्रमिक मुक्ती दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर शेतकरी संघटना व मित्र पक्ष यांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ मेढा येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपिठावर उपस्थित खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे जि. प. चे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती,
आजवरचे सर्व समज – गैरसमज व जुन्या गोष्टी दूर ठेवून नव्याने आणि एकजुटीने कामाला लागूया. कोणतीही शंका – कुशंका न ठेवता प्रचंड मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष यांच्या आघाडीचे सरकार स्थापन व्हावे म्हणून सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न पवारसाहेबांनी केला आहे. देशाचे राजकारण व हित लक्षात घेता सर्वांनीही एकदिलाने काम करूया, कोणी कितीही प्रयत्न केला तरी जावळीवासीय आजवर नेहमीच राष्ट्रवादीच्या पाठीशी राहीले आहेत. गेल्या पाच वर्षात आपण सत्तेत नसतांनाही जावळीवासीयांची अनेक विकास कामे मार्गी लावले आहेत. इथल्या काही शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी श्री. छ. उदयनराजे नक्कीच लक्ष घालतील व जनतेस दिलासा देतील, असेही आमदार भोसले यावेळी म्हणाले.
कारण नसतांना उगाचच गैरसमज पसरवण्याचे काम काही मंडळी मुदाम करत असतात त्यांच्या भूल थापांना बळी न पडण्याचे आवाहन करून श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, माझ्या जन्माच्या दोन अडीचशे वर्ष अगोदरपासून देवस्थाने अस्तित्वात आहेत, मी मंत्री असतांना जमिनीच्या मालकीबाबत कटकारस्थान करून माझी मालकी लावल्याचे सांगणारी मंडळी खोटारडी व बदमाश आहेत, माझे त्यांना आवाहन आहे कि, माहितीच्या अधिकाराचा उपयोग करुन या बाबतचे खरे खोटे जाणून घ्यावे, जनतेच्या हक्कावर गदा येईल असे मी आजवर कधी वागलो नाही आणि यापुढेही वागणार नाही, प्रसंगी मरण पत्करेन मात्र कोणास कधी अडचणीत आणणार नाही, तुमची जमीन तुम्हीच कसता. अशा परिस्थितीत माझ्याबाबत लोकांच्या मनात विष घालण्याचे काम काही लोक करतात. मात्र त्यास बळी पडू नका. बोडारवाडी धरणासाठी निर्धाराने आपण कामास लागूया. भविष्यात पाण्यासाठी लढाई होऊ नये यासाठी राष्ट्रवादी व मित्रपक्ष यांना संधी द्या .
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की , ही लढाई देशातील राजकीय बदलांची आहे. ती जिंकून आपण देशात नवे क्रांतिपर्व आणू. जर या लढाईत आपण मागे पडलो तर शेतकरी अस्तित्वात राहणार नाही. माथाडी कधीच संपून जाईल. विकासाचे युग शिल्लक राहणार नाही. आणि तरुणांचे भवितव्य काळवंडून जाईल. त्यामुळे भावी सुखासाठी महाराजांना विजयी करा. माथाडी कामगारांचे कायदे आणि नियम संकुचित करण्याचे धोरण सद्याचे सरकार आखात आहे त्यामुळे सर्व सामान्य माणूसच सत्तांतराचा पाय रचेल. माथाडींचे भवीतव्य घडवायचे असेल आणि माथाडी चळवळ टिकवायची असेल तर सध्याच्या सरकारला खाली खेचलेच पाहिजे.
यावेळी मेढ्याचे उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ, माजी सभापती सुहास गिरी, जिल्हा परिषद सदस्य अर्चना रांजणे, कविता धनावडे , निर्मला दुधाणे ,समिंदरा जाधव, रोहिणी निंबाळकर , बाळासाहेब गोसावी, कांतीभाई देशमुख, मोहन कासुर्डे, दत्ता पवार, विजय सुतार,रामभाऊ शेलार,अविनाश करंजकर,मोहनराव शिंदे आदींसह परिसरातील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोट्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular