वडूज: खटाव तालुक्यातील कलेढोण पंचायत समिती गणात पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. या पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा निघावा याकरीता पंचायत समिती सदस्या सौ. मेघा जीवन पुकळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे कलेढोण परिसराला टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी द्यावे अशी मागणी केली होती. सदरचे निवेदन पाटबंधारे प्रशासनाकडे चौकशीकरीता आले. मागणी कोणती आहे याची शहानिशा न करता पाटबंधारे विभागाच्या अधिक्षकांनी कलेढोण भाग उंचावर असल्याने उरमोडी योजेनेचे पाणी देता येणार नाही. असे सांगत नकारात्मक पाढा वाचला आहे. त्यांच्या या चुकीच्या पत्रामुळे परीसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत सौ. पुकळे यांनी दिलेल्या निवेदनातील माहिती अशी, कलेढोण परिसरात सद्या कोणत्याही योजनेचे पाणी येत नाही. तरीही या परिसरात तुटपुंज्या पाण्यावर अनेक गावात शेकडो एकर द्राक्ष बागा जगविल्या आहेत. पाण्याअभावी या बागा जळून जावू लागल्या आहेत. तर बहुतांशी गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. अश्या परस्थितीत पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची कायमस्वरुपी समस्या सुटावी याकरीता गारळेवाडी येथून टेंभूचे पाणी भागाला द्यावे अशी मागणी सौ. पुकळे यांनी पाटबंधारे मंत्र्यांकडे केली होती. ही मागणी चौकशीकरीता प्रशासनाकडे आल्यानंतर कलेढोण विभागातील गांवे उरमोडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रा बाहेरील आहेत. या पाण्याचे वाटप झाले आहे. प्रकल्पात पाणीसाठा शिल्लक नाही. वरील गांवे कालव्याच्या 70 कि.मी. पेक्षा अधिक उंचीवर असल्याने पाणी देता येणार नाही असे उत्तर पाटबंधारे विभागाने मंत्री महाजन यांना कळविले आहे. त्याची प्रत माहितीसाठी सौ. पुकळे यांनाही देण्यात आली आहे.
अश्याप्रकारे कलेढोण विभागातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याबरोबर मंत्री महोदयांची दिशाभूल करणार्या अधिकार्यावर कारवाई करावी अन्यथा भागातील जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जीवनशेठ पुकळे यांनी दिला आहे.
मागीतले टेंभूचे पाणी …. उत्तर मिळाले उरमोडीचे पाणी देता येणार नाही !
RELATED ARTICLES