वडूज : घरगुती व लहानश्या स्वरूपात सुरू झालेल्या व्यवसायाला आर्थिक पाठबळाबरोबरच योग्य मार्गदर्शन, उत्पादनाबरोबरच व विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळाली. अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आणि लहानश्या व्यवसायाचे एका चांगल्या लघु उद्योगात रूपांतर झाले. विविध उद्योग, व्यवसायांत कर्तुत्व गाजविणार्यांचा महाउद्योजक सन्मनाने गौरव करण्यात आला.
आय.एम.डी.एस.( इन्स्टिट्यूट ऑफ महा ई-लर्निंग अॅन्ड डिग्नीटी स्किल, डेव्हलपमेंट लि.) च्यावतीने पहिल्या राज्यस्तरीय महाउद्योजक सन्मान सोहळा सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात झाला. यावेळी प्रख्यात व्याख्याते अनिल माने, डॉ. सौ. सुप्रिया साळुंखे-कदम, डॉ. सौ. स्नेहांजली महामुनी – सुतार, सामाजिक कार्यकर्ते हणमंतराव पवार, आय.एम.डी.एस.चे संचालक अमोल शिंदे, विश्वजीत मुनेश्वर, योगेश शेलार आदी मान्यवर तसेच राज्याच्या विविध भागांतील सुमारे एक हजारहून अधिक स्त्रिया, पुरूष उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महाउद्योजक सन्मान पुरस्काराने राज्याच्या विविध भागांतील उद्योजकांना सन्मानीत करण्यात आले. विशेषत: यामध्ये महिला उदयोजिकांची संख्या अधिक होती. पुरस्कारप्राप्त उद्योजकाचे नाव, त्यांचे गाव व व्यवसाय पुढीलप्रमाणे : जयश्री निकम ( कवठेमहांकाळे जि. सांगली, सॅनिटरी पॅड मेकींग), फरहीन शेख (धुळे, हॉटेल इंडस्ट्री), वृषाली चौधरी (नाशिक, उद्योजकता विकास केंद्र), संजय सोनवणे (इगतपुरी जि. नाशिक, फुलवात प्रकल्प), स्नेहा मोहिते (दापोली, अगरबत्ती), सौ. रेश्मा तानवडे (सिद्धेश्वर कुरोली जि. सातारा सॅनिटरी पॅकींग युनिट), सत्यवान नामदास (म्हसवड, अगरबत्ती उद्योग), धर्मराज लोखंडे (म्हसवड, प्रशिक्षण केंद्र), पंकज देशमुख (धुळे, गितांजली फूड), सुरेखा पाटील (इस्लामपूर, चकली उद्योग), कल्पना पाटणकर (कडेगाव, चकली उद्योग), अरूणा मोरे (धुळे, चकली उदयोग).
यावेळी सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी म्हणून सौ. रेश्मा तानवडे, सर्वोत्कृष्ट अध्यक्ष म्हणून सारीका फडतरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बारा प्रतिनिधींना मानधनाच्या धनादेशांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री. माने म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची मूहूर्तमेढ याच सातारा जिल्ह्यात रोवली, तिचा वेलू आज गगनावरी पोहोचला आहे. आय.एम.डी.एस. ही सर्वांच्याच जीवनात स्वावलंबनातून परिवर्तन घडविणारी एक महत्वाची संस्था बनली आहे.
डॉ.सौ.साळुंखे म्हणाल्या, महिलांना समाजकारण, राजकारणात संधी आहेत त्यांचा स्विकार करावा. महिलांचे केवळ सबलीकरण न होता सक्षमीकरण होणे महत्वाचे आहे. महिलांना स्वबळावर उभे करण्यात व सक्षम करण्यात आय.एम.डी.एस. महत्वाची कामगिरी पार पाडत आहे त्यामुळे महिलांनी एकत्र येऊन उदयोग, व्यवसायांची उभारणी करून स्वत:बरोबरच समाजाचीही प्रगती साधावी. महिलांनी हाऊस वाईफ बनण्यापेक्षा हाऊस मेकर बनावे.
डॉ.सौ. महामुनी म्हणाल्या, महिलांकडे असणारा काटकसर व बचतीचा दृष्टीकोन हे उदयोजकतेचे पहिले यशस्वी पाऊल आहे. त्यामुळे महिलांनी सुरू केलेल्या लघु उदयोगाकडे एक संधी म्हणून पहावे, त्यांना आव्हान मानून स्विकारावे. त्यामुळे आगामी काळात निश्चीतच महिला एक यशस्वी उदयोजिका झालेली दिसेल.
आय.एम.डी.एस.चे संचालक श्री. शिंदे, मुनेश्वर, शेलार यांनी यांनी आय.एम.डी.एस.च्या विविध योजनांची माहिती दिली. श्री. किरण लोखंडे, यांनी सुत्रसंचालन केले. सौ. दिपाली लोखंडे यांनी आभार मानले.
उद्योग, व्यवसायांत कर्तुत्व गाजविणार्यांचा महाउद्योजक सन्मानाने गौरव
RELATED ARTICLES