वडूज : निमसोड (ता. खटाव) येथील शंभूराज शिवाजी घाडगे या वाणिज्य शाखेच्या पदवीधर विद्यार्थ्याने पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्राने 20 गुंठे क्षेत्रात हिरवी मिरचीचे पिक घेतले आहे. या पिकाच्या माध्यमातून एका महिन्यात सुमारे पावने दोन लाखाचे उत्पन्न निघाले आहे. तर हंगाम संपेपर्यंत सुमारे सहा लाखाचे पुर्ण उत्पादन होईल असा कृषी तज्ञांचा अंदाज आहे.
आजकाल पदवी घेवून बेकार राहणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातली त्यात बी.कॉम. अनं बेकाम अश्या अर्थाची म्हण रुढ आहे. मात्र या म्हणीला अपवाद ठरले आहेत निमसोड येथील शंभूराज घाडगे. घाडगे यांचे वडील शिवाजीराव व चुलते तानाजीराव यांच्या एकत्रित कुटुंबाची गावामध्ये 10 ते 11 एकर जमीन आहे. यापैकी काही क्षेत्र कॅनॉलवर तर काही क्षेत्र विहीर बागायती आहे. या शेतामध्ये ऊस, मका व इतर पारंपारिक पिके घेतली जात होती. त्यातही ऊसाची तोड आणण्यासाठी वेगवेगळ्या साखर कारखान्यांना आर्जव करणे. ऊस घातल्यानंतर पैशासाठी हेलपाटे मारणे असा व्याप करावा लागत असल्याने घाडगे कुटुंबियांना शेतीचा वीट आला होता. परंतू दुसरा कोणताही पर्याय नाही. तसेच पदवी घेवून किरकोळ नोकरी शोधत बसण्यापेक्षा शेतीतच वेगळे प्रयोग करावेत असे शंभूराजेंच्या डोक्यात आले. पहिल्यांदा त्यांनी मेथी लागवडीचा प्रयोग केला.
मात्र त्यामध्ये त्यांना म्हणावे असे यश आले नाही. तरीही खचून न जाता त्यांनी हिरव्या मिरची लावण्याचा निर्णय घेतला. 20 गुंठे क्षेत्रात गादी वो तयार करुन त्यावर मल्चींग पेपर टाकून एच. पी. 57/36 या वाणांच्या रोपांची लागवड केली. लागवडीनंतर ठिबक संचाद्वारे नियमित पाणी, खते, औषधांच योग्य वापर केला.
याकामी त्यांना गावातील विश्वविनायक अॅग्रो सेंटरचे विशाल कदम, विनायक कदम, कृषी क्रांती चे सागर बरकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आत्तापर्यंत या पिकाचे 3 तोडे झाले असून 1 लाख 80 हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. अजून किमान 4 ते 5 तोडे होणार असून 60 रुपये प्रति किलोचा दर सापडला तरी 6 लाखापेक्षा जादा उत्पन्न निघू शकते. त्यास वडील शिवाजीराव, चुलते तानाजीराव व इतर चुलत बंधूंचे सहकार्य मिळत आहे.
वाणिज्य शाखेच्या पदवीधराची किफायती शेती , हिरव्या मिरचीचे विक्रमी उत्पादन
RELATED ARTICLES