सातारा ः भारताला आताच्या विदारक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी व्यवस्था बदलाचा लढा आपणाला लढावा लागेल. हा लढा समाजाच्या सर्व घटकांना घेऊनच यशस्वी करता येईल, असे प्रतिपादन सेवानिवृत्त आय.पी.एस.अधिकारी व साहित्यिक सुरेश खोपडे यांनी केले आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ , महाराष्ट्र च्या साताराशाखेच्यावतीने सुरेश खोपडे यांनी लिहलेल्या नवी दिशा,अठरा पगड मावळे शिवशाहीचेहरे नको, व्यवस्था बदलुया या पुस्तकावर खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.विद्रोही सांस्कृतिक चळवळ , महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विजय मांडके यावेळी उपस्थित होते.
नवी दिशा,अठरा पगड मावळे शिवशाहीचेहरे नको, व्यवस्था बदलुया या पुस्तकावर बोलताना सुरेश खोपडे म्हणाले, आपल्या देशात इतक्या समस्या असून देखील त्याच्या मुळाशी जाऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात नाही. भारतातील विविध प्रश्नांना विशिष्ट लोक किंवा चेहरे जबाबदार असण्यापेक्षा व्यवस्थाच प्रश्न कायम राहण्यासाठी जबाबदार आहे.
व्यवस्था बदलाचा लढा उभारण्यासाठी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून त्यांचा व्यवस्थेवर दबाव निर्माण करावा लागेल असेही ते म्हणाले. व्यवस्था बदलाच्या लढ्याला नव्या साधनांची आणि ज्ञानाची जोड देणं गरजेचे आहे.
राज्यघटनेने सांगितलेला आम्ही भारताचे लोक ही ओळख प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण झाली पाहिजे.व्यवस्था बदलाच्या लढ्यात ज्यांना आवाज नाही त्यांना आवाज द्यावा, ज्यांना शक्ती नाही त्यांना शक्ती दिल्यास व्यवस्था व्यवस्था परिवर्तनाचा लढा यशस्वी होऊ शकतो, असे सुरेश खोपडे यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी भिवंडीमध्ये राबविलेल्या मोहल्ला कमिटीचे उदाहरण दिले. मोहल्ला कमिटी यशस्वीपणे राबवल्याने 1993 ला भिवंडी शहर शांत राहिले, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी यासंदर्भात पॉवर पाँइंट प्रेझेन्टेशन केले. सत्यशील शिंदे , गौतम भोसले , प्राचार्य चंद्रकांत नलावडे प्रा अमिर इनामदार यांनी चर्चेत सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विजय मांडके यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत एड.राजेंद्र गलांडे यांनी मासिक सम्यक विद्रोही चे अंक व ग्रंथ देवुन केले. यावेळी सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता युवराज पवार , सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता थोरात , एस. एस. आवडे , दिनकर झिंब्रे , अरिफ बागवान , जयंत ऊथळे , दिलिप ससाणे , गणेश दुबळे , दिलिप भोसले , शाहीर भानुदास गायकवाड , जेष्ठ पत्रकार प्रशांत पवार, सत्यशील शिंदे,संकेत माने, शुभम ढाले , अक्षय कारबळ, रश्मी लोटेकर , नम्रता पिंपळे, शुभम कदम, विजय शिंदे,रोहित क्षीरसागर यांच्यासह विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल गंगावणे यांनी केले. आभार युवराज जाधव यांनी मानले.
व्यवस्था बदलाचा लढा समाजाच्या सर्व घटकांना घेऊन लढावा लागेलः सुरेश खोपडे
RELATED ARTICLES