Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीवेण्णालेक बोटक्लब बंद असल्याने पालिकेला रोज साधारण दिड ते दोन लाख रूपयांचे...

वेण्णालेक बोटक्लब बंद असल्याने पालिकेला रोज साधारण दिड ते दोन लाख रूपयांचे नुकसान

महाबळेश्‍वरः वेण्णालेक बोटक्लबच्या परवान्याच्या नुतनीकरणासाठी महसुल विभागाने या पुर्वी कोणीच मागितली नाही. अशा कागदपत्रांची मागणी करून पालिकेची कोंडी केली आहे या कागदपत्रांवरून महसुल विभागाला जाब विचारण्याची आवश्यकता असताना सत्ताधारी गट मात्र वेगळयाच कारणाने चिंतीत असल्याने महसुल विभागाच्या विरोधात ब्र काढण्यास तयार नाही. त्यामुळे धरलं तर चावतयं, सोडलं तर पळतय अशी सत्ताधारी गटाची अवस्था झाली आहे. बोटक्लब बंद असल्याने पालिकेला मात्र रोज साधारण दिड ते दोन लाख रूपयांचे नुकसान होत आहे.
महाबळेश्‍वर हे राज्यातील प्रसध्दि थंड हवेचे ठिकाण आहे येथे दरवर्षी पंधरा ते अठरा लाख पर्यटक सहलीसाठी येतात. शहरापासुन दोन किमी अंतरावर असलेले वेण्णालेक हे येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. कारण या ठिकाणी पालिकेच्या वतीने नौकाविहाराची सोय करण्यात आली आहे. या शिवाय येथे करमणुक केंद्र गरमा गरम मक्याचे कणीस, पावभाजी, भेळपुरी, पाणीपुरी, आईस्क्रीम अशी भलीमोठी मेजवानी आहे. तसेच घौडेसवारीही येथे आहे त्यामुळे हंगामात दिवसभर येथे पर्यटकांची रेलचेल असते. वेण्णालेक पालिकेने तत्कालिन जिल्हाधिकारी यांच्या खास परवानगीने येथे बोटक्लब सुरू केला आहे. तेव्हापासुन दरवर्षी बोटक्लब परवान्याचे नुतनीकरण करण्यात येते. नुतनीकरण असल्याने महसुल विभागाच्या वतीने कागदपत्रांची पडताळणी सोप्या पध्दतीने केली जाते. या बाबत पालिकेला कधीच अडचण भासली नाही. विशेष म्हणजे परवान्याच्या नुतनीकरणासाठी पालिकेचे मुख्याधिकारी अथवा नगराध्यक्षा वेळीच पाठपुरावा करून मुदत संपण्यापुर्वीच परवान्याचे नुतनीकरण करून घेत असत. सध्या पालिकेत सत्तेवर असलेले भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि पालिकेचे मुख्याधिकारी यांना मात्र बोटक्लब परवान्याचे नुतनीकरण करण्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. महसुल विभागाचे अधिकारी यांनी देखिल बोटक्लबला परवाना आहे का नाही हे पाहण्याची कधी तसदी घेतली नाही. 12 जुन रोजी येथे अपघात घडला आणि या मध्ये एका युवकाला आपल्या प्राणास मुकावे लागले आणि सर्व यंत्रणा खडबडुन जागी झाली. 2015 पासुन बोटक्लब परवान्याचे नुतनीकरण झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचा अर्थ गेली चार वर्षे पालिकेने हा बोटक्लब परवान्या शिवाय बेकायदेशिर चालवुन करोडो रूपयांचे उत्पन्न मिळविले.
वेण्णालेक येथील पाण्यात बुडून एका युवकाचे प्राण गेल्यानंतर जागे झालेल्या पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी धावपळ करून त्याच दिवशी म्हणजे 12 जुन रोजी बोटक्लब नुतनीकरणासाठी तहसिलदार यांचे कडे अर्ज सादर केला. दरम्यान बोटक्लबला परवाना नसल्याने हा बोटक्लब बंद करण्याची तोंडी सुचना पोलिस विभागाने केल्याने हा बोटक्लब ऐन हंगामात बंद पडला आहे. पालिकेतील सत्ताधारी लोकप्रतिनिधी व मुख्याधिकारी यांनी वेळीच परवान्याचे नुतनीकरण करून घेतले असते तर हे नुकसान टाळता आले असते. परंतु खरेदी करून ठेकेदारांनी बिले अदा करण्यातुन सत्ताधारी गटाला व मुुख्याधिकारी यांना वेळ मिळत नाही.
बोटक्लब नुतनीकरणाचा अर्ज आल्यानंतर महसुल विभागाने अनेक कागदपत्रांची मागणी पालिकेकडे केली आहे. यामध्ये बोटक्लब चालविण्याचा मुळ परवाना , बोटी चालविण्यास सक्षम आहेत याचा सक्षम शासकिय विभागाचा दाखला , पोलिस विभागाचा ना हरकत दाखला, वेण्णाधरणाची मालकी असलेल्या विभागाचा ना हरकत दाखला , बोटी चालविणारे बोटमन हे प्रशिक्षित असल्याचे प्रमाणपत्र, महसुल विभागाने मागणी केलेली सर्व कागदपत्रे जमा करण्यासाठी पालिकेला खुप धावपळ करावी लागणार आहे. प्रमाणपत्रांसाठी टेबलावर प्रकरण सादर करून चालणार नाही तर टेबला खालुनही प्रयत्न करावे लागणार आहे. त्यामुळे हा बोटक्लब कधी चालु होईल हे सांगणे कठीण होवुन बसले आहे.
एखादया अपघाताने बोटक्लब बंद करण्याची आवश्यकता नव्हती. दोन दिवसांनी हा बोटक्लब चालु करणे आवश्यक होत परंतु महसुल विभागाशी पंगा नको म्हणुन पालिकेतील सत्ताधारी गट कोणतेच धाडस करू इच्छित नाही. कारण या पुर्वी टोल प्रकरणात पालिकेने केलेले धाडस तत्कालिन सत्ताधारी गटाच्या अंगलट आले होते. टोल प्रकरणात पालिकेने जिल्हाधिकारी अश्‍विन मुदगल यांना आव्हान दिले. त्यामुळे चिडुन जिल्हाधिकारी यांनी त्यांचेकडे असलेल्या नगरसेवक अपात्रता प्रकरणाचा तडकाफडकी निकाल जाहीर करून अनेक नगरसेवकांना अपात्र ठरविले होते. असेच प्रकरण पालिकेतील सत्ताधारी गटाचे जिल्हाधिकारी यांचेकडे प्रलंबित आहे. या प्रकरणा वरून पालिकेने महसुल विभागाशी पंगा घेतला हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बोटक्लब बंद पडुन कितीही नुकसान झाले तरी चालेल परंतु महसुल विभागाविरोधात सत्ताधारी गट ब्र सुध्दा काढणार नाहीत ही काळया दगडा वरील रेष आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular