Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीआठ दिवसांत ओला दुष्काळ जाहीर न झाल्यास शेतकरी तीव्र आंदोलन करणार :-...

आठ दिवसांत ओला दुष्काळ जाहीर न झाल्यास शेतकरी तीव्र आंदोलन करणार :- विक्रमबाबा पाटणकर

पाटण :- पाटण तालुक्यात गेले अडीच महिने सतत मुसळधार पडत असलेल्या पाऊसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून. वर्षभर पुरेल इतकही पिक शेतकऱ्यांच्या हाताला लागेल याची शाश्वती राहिली नाही. तर गुरांच्या वैरणीचाही प्रश्र्न गंभीर झाला आहे. पावसाच्या आस्मानी संकटाबरोबर वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पाटण तालुक्यात आठ दिवसांत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा पाटण तालुक्यातील शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी शेकोटी आंदोलनावेळी दिला.
पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी विक्रमबाबा पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पाटण तहसील कार्यालयासमोर शेकोटी आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.
विक्रमबाबा पुढे म्हणाले पाटण तालुक्यात ७ जून पासून सलग अडीच महिने मुसळधार पाऊस सुरू आहे. १५ जुलै पासून कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला आहे. या वरून पाटण तालुक्यातील अतिवृष्टीचे स्वरूप लक्षात येते. भुईमूग, हायब्रीड, सोयाबीन, ऊस, नाचणी, मुग, तूर आदी पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. तरी देखील प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. शेतात पेरणी केलेल्या बियाणासह उगवून आलेली पिके देखील कुजली आहेत. तर काही ठिकाणी वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांना वर्षभर जगण्यासाठी पुरेल इतके ही पिक शेतकऱ्यांच्या हाताला लागेल अशी परिस्थिती यंदाच्या पाऊसाने ठेवली नाही. गुरांना वर्षभर मिळणारी वैरण देखील नष्ट झाली आहे. या सतच्या पाऊसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल करून सोडले आहे. अजून हि पाऊस थांबण्याचे चिन्हे दिसत नाही. या बरोबर वन्य प्राणी ही पिकांचे नुकसान करत आहेत. म्हणून पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.
आठ दिवसांत ओला दुष्काळ जाहीर झाला नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ओला दुष्काळाच्या मागणीसाठी पाटण तहसील कार्यालयासमोर शेकोटी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रा. रविंद्र सोनावले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास हादवे, दादासाहेब कदम, बाळासाहेब देसाई, लक्ष्मण चव्हाण, अनिल भोसले, सुरेश भोसले, संतोष इंदुलकर, सचिन देसाई, चंद्रकांत चौधरी, चंद्रकांत टोळे, अमर लोहार, पंकज नायकवडी, विकास घाडगे, सुनील चौधरी, अनिल टोळे, आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular