पाटण :- ( शंकर मोहिते ) पाटण तालुक्यात गेले अडीच महिने सतत मुसळधार पडत असलेल्या पाऊसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून. वर्षभर पुरेल इतकही पिक शेतकऱ्यांच्या हाताला लागेल याची शाश्वती राहिली नसताना. गुरांच्या वैरणीचाही प्रश्र्न गंभीर झाला असताना. पावसाच्या आस्मानी संकटाबरोबर वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला मागणी करणारे निवेदन सातारा जिल्हाधिकारी व तहसीलदार पाटण यांना पाटण तालुक्यातील शेतकरी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी शेकोटी आंदोलन देखील केले. तरी देखील शासनाने ओला दुष्काळ संदर्भात काहीएक निर्णय शेतकऱ्यांना दिलेला नाही. तीन सप्टेंबर सोमवार पर्यंत शासनाकडून निर्णय झाला नाही तर झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी पाटण तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बोंबाबोंब होळी आंदोलन करणार असल्याचा इशारा सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी तहसील कार्यालयात झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत दिला.
यावेळी आर.पी.आय.चे. पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रा. रविंद्र सोनावले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सदाभाऊ जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास हादवे, शिवाजीराव कोळेकर, शिवसेना पाटण शहरप्रमुख शंकरराव कुंभार, पंडीतराव मोरे, दिपकराज निकम, सरनोबत सांळुखे, अनिल बोधे, आदी पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
पाटण तालुक्यात ७ जून पासून सलग अडीच महिने मुसळधार पाऊस सुरू आहे. १५ जुलै पासून कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला आहे. या वरून पाटण तालुक्यातील अतिवृष्टीचे स्वरूप लक्षात येते. भुईमूग, हायब्रीड, सोयाबीन, ऊस, नाचणी, मुग, तूर आदी पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. तरी देखील प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. शेतात पेरणी केलेल्या बियाणासह उगवून आलेली पिके देखील कुजली आहेत. तर काही ठिकाणी वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांना वर्षभर जगण्यासाठी पुरेल इतके ही पिक शेतकऱ्यांच्या हाताला लागेल अशी परिस्थिती यंदाच्या पाऊसाने ठेवली नाही. गुरांना वर्षभर मिळणारी वैरण देखील नष्ट झाली आहे. या सतच्या पाऊसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल करून सोडले आहे. अजून हि पाऊस थांबण्याचे चिन्हे दिसत नाही. या बरोबर वन्य प्राणी ही पिकांचे नुकसान करत आहेत. म्हणून पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे पाटण तालुक्यातील शेतकरी व सर्व पक्षीय तालुका अध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे सातारा जिल्हाधिकारी आणि तहसीलदार पाटण यांना निवेदनाद्वारे केली आहे. तरी देखील राज्य शासनाकडून पाटण तालुक्यातील अतिवृष्टी व ओला दुष्काळ संदर्भात कोणताच निर्णय घेतला गेला नाही. म्हणून पुढील आठ दिवसांत तीन सप्टेंबर सोमवार अखेर पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी तीन सप्टेंबर सोमवारी पाटण तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा बोंबाबोंब होळी आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांसोबत विक्रमबाबा पाटणकर यांनी निवेदनाद्वारे राज्य शासनाला दिला आहे.