Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीदादा... एक रत्न...

दादा… एक रत्न…

पाटणचे रत्न भाग्यविधाते श्रीमंत सरदार
मा. विक्रमसिंह पाटणकर ( दादा ) यांचे ७५ वे अमृतमहोत्सवी वर्ष पाटण तालुक्याल जनतेसाठी लौकीक आहे. या निमित्ताने तमाम पाटण तालुक्यातील जनतेच्या वतिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते व राज्यातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर या रत्नाचा नागरी सत्कार होत आहे. या निमित्ताने पाटणच्या या रत्नाचा घेतलेला मागोवा…


१९८३ सालापासुन पाटण तालुक्याने पाहिलेले संयमी व सार्वजनिक विकास कामात अग्रेसर असलेलं नेतृत्व वयाच्या ७५ व्या वर्षी राजकारण, समाजकारण, आणि विकास कारणात अग्रेसर आहे. नावातच विक्रम तर का नाही विकास कामात विक्रम… आजच्या बोलबच्चन तरूण नेत्यांनाही त्यांच्या उभ्या आयुष्यात न फिटणारा विकास कामांचा विक्रम पाटण तालुकाभर करून ठेवला आहे. म्हणूनच या रयतेचे श्रीमंत सरदार.. ते सरकार… ” दादा ” च आहेत. गोरगरीबांच्या मदतीला धाहुन जाणारे, सुख दु:खात सामील होणारे असे हे रत्न.. पाटण तालुक्याचे भाग्य आहे.
निवकणे यात्रे निमीत्त प्रतिवर्षी मणदुरे काऊदऱ्यावर होणाऱ्या जेजुरी मार्तांड-जानाई पालखी सोहळा स्वागत समारंभ आणि निसर्ग पुजेच्या उत्सवासाठी काऊदऱ्यावर दांदाच्या बरोबर मी जात होतो. प्रवासात अनेक चर्चा रंगत असताना सद्या पाटण तालुक्यात खालच्या पातळीवर होत असलेली भाषणबाजी आणि निवडणूक प्रचाराची घसरत असलेली पातळी यावर दादा स्वत: बोलत होते.
” दादा ” म्हणतात की विरोधकाकडून नेहमीच २००४ व २०१४ चे उटे काढले जाते. सतत त्यांच्या कडून शिमगा केला जातो. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याचा पराभव करून मी आमदार झालो. या मी पणाचा कीस्सा सांगताना एका प्रवासात दादा आमच्या बरोबर बोलताना म्हणाले. महाराष्टाच्या निर्मिती पासून ते १९८३ साला पर्यंत स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे एक वलय होते. स्व. यशवंतराव चव्हाणानंतर बाळासाहेबांचे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मोठे स्थान होते. एक वेळ संपुर्ण महाराष्ट्रातुन विधानसभेवर बिनविरोध निवडून जाणारे बाळासाहेब देसाई होते. अशा बलाढ्य नेत्यापुढे मी राजकारणात नवख्खा होतो. १९८० सालाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तेचे विकेंद्रीकरण नको म्हणून मला बाळासाहेबांच्या विरोधात पाटण तालुक्यातील जनतेने उभे केले. त्यावेळी मला असे वाटले की एवढ्या बलाढ्य नेत्यापुढे माझा निभाव काही लागणार नाही. मोठ्या फरकाने या निवडणुकीत माझा पराभव होईल. पण पाटण तालुक्याच्या जनतेच्या मनात बदल घडवायचाच होते. या दृष्टीने सर्वजण काम करत होते. स्व. भागवतराव देसाई, तात्यासाहेब दिवशीकर, एच. डी. पाटील, एल. एम. पवार, बाळासाहेब माने, प्रतापराव जानुगडे अशी दिग्गज मंडळी माझ्या निवडणुकीत प्रचारासाठी उतरले होते. तालुक्याचे राजकारण सर्व स्तरातुन ढवळून निघाले होते. प्रचाराच्या फैरी झडत होत्या. या निवडणुकीचे वैशिष्ट्य प्रचार कधी आजच्या सारखा खालच्या स्तरावर गेला नाही. लोकनेते बाळासाहेबांचा उल्लेख आम्ही प्रचारात आदरयुक्तच करत होतो. कधी त्यांच्यावर आरोप – प्रत्यारोप केला नाही. बाळासाहेब देखिल प्ररखड स्वभावाचे होते. त्यांनीही कधी आरोप – प्रत्यारोप केले नाही. पण प्रचार हा धुमधडाक्यात चालु होता. मतदान झाले. निवडणुकीचा निकाल हाती आला. केवळ ४५०० मतांनी माझा पराभव झाला.


महाराष्ट्राच्या राजकारणातील बलाढ्य नेत्यापुढे केवळ ४५०० मतांनी पराभव म्हणजे जनतेच्या मनात एकप्रकारे माझा हा विजयच होता. महाराष्ट्राच्या राजकारणात ३५ वर्ष नेतृत्व असलेले त्यातील ३० वर्ष विविध खात्यांच्या कॅबिनेट मंत्रीपदावर विराजमान असलेले लोकनेते बाळासाहेब देसाई. केवळ ४५०० मतांनी निवडून आले. एक नवखा तरूण उमेदवार निवडणुकीत ऐवढी कडवी झुंज देतो, म्हणून विधानसभेतील आमदार, मंत्र्यांनी माझा मुंबईत सत्कार केला. त्यावेळीही राज्याच्या राजकारणात एक कुतुहल निर्माण झाले होते. पण माझ्या कडून या गोष्टीचा उहापोह झाला नाही. जसा आज विरोधकांच्याकडून सतत होतो.
१९८३ साली लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे झालेले अकाली निधन, निधना नंतर केवळ पाटण तालुकाच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र एका धुरंदर नेत्याला मुकला. या काळात पाटण विधानसभा मतदार संघाची पोट निवडणुक लागली. बाळासाहेबांचे पुत्र कै. शिवाजीराव देसाई यांच्याबाजुने सहानुभुतीची लाट होती. खरतर हि निवडणुक लढण्यास माझा विरोधच होता. मात्र काही केल्या कार्यकर्ते व जनता ऐकत नव्हती. आपणाला सहानभुतीच्या विरोधात किंवा कै. शिवाजीराव देसाई यांच्या विरोधात लढायचे नाही. तर लोकनेत्यांचे विचार घेऊन निवडणुक लढवायची आहे. अशा जनतेच्या आग्रहखातर मी १९८३ ची विधानसभा पोटनिवडणुक लढण्यास तयार झालो.
या निवडणुकीतही कै. शिवाजीराव देसाई यांच्यावर भाष्य केले नाही. किंवा आरोप – प्रत्यारोपही केले नाहीत. केवळ लोकनेत्यांचे विचार घेऊनच निवडणुकीच्या प्रचारात उतरलो. आणि सहाजिकच जनतेची सहानभुती माझ्या बाजुने फिरली. सरासरी अकरा ते साडेअकरा हजार मताच्या फरकाने माझा विजय झाला. या विजयाने मी हुरळून गेलो नाही. हा विजय मी लोकनेते बाळासाहेबांनाच समर्पित केला. इथुन पुढे पाटण तालुक्यातील जनतेने माझ्या कामावर विश्वास ठेवला. हल्ली लोकनेत्यांचा वारसा सांगणा-या विरोधकांकडून राजकारणाची पातळी घसरत आहे हे दृदैवी वाटते. आणि तितकेच वाईट हि वाटते असो..
असे संयमी नेतृत्व १९८३ सालापासून आजपर्यंत श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर दादांच्या रूपाने अनुभवले आहे. दादांच्या विचारात लोकनेत्यांचेच विचार असल्याने पाटण तालुक्यातील जनताही त्यांना ‘बाळ सरकार’ या नावाने संबोधते. राज्याच्या सत्तेच्या राजकारणात व सरकारात दादा असो अथवा नसो, पाटण तालुक्यातील जनतेचे “सरकार” बाळ सरकारच आहेत.
अशा या शांत संयमी नेतृत्वाला ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

लेखन
श्री. शंकर मोहिते.
पत्रकार पाटण.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular