कराड : राज्याच्या राजकारणात ज्येष्ठे नेते यशवंतराव चव्हाण नावाचे वैचारिक विद्यापीठ आहे. त्यात यशवंत विचारांचा सांप्रदाय आहे. विलासराव पाटील-उंडाळकर त्याच सांप्रदायातील विचारांचे वारसदार आहेत, त्यांनी यशवंत विचारांचा वारसा चालवलाच नाही. तर तो मनापासून जोपासला असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या समाजकारणातील भगीरथ गौरव ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर, ज्येष्ठ कृषीअर्थ तज्ञ डॉ. निळकंठ रथ, ज्येष्ठ साहित्यीक रामदास फुटाणे, रायगडचे आमदार जयंत पाटील, विलास रकटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते. गौरव ग्रंथाचे प्रकाशन कृषी अर्थ तज्ञ श्री. रथ यांच्या हस्ते झाले.
डॉ. मोरे म्हणाले, विलास काका म्हणजे राजकारणातील युनिक व्यक्तीमत्व आहे. ही खर तर अभिमानाची गोष्ट आहे. मात्र ते एकटेच युनिक नको होते. त्यांच्यासारखे सगळेच राजकीय लोक युनिक असायला हवे होते. दुर्देवाने ते नाहीत. त्यामागे बरीच कारणे आहेत. अर्थात राजकारण म्हणजे साधन आहे, ते साध्य नाही. समाजकारण साध्य ते साधन नाही, अशी खरं तर विचारसरणी आहे. मात्र नेमक्या त्याच विचारसरणीचा साध्य साधन विवेक हरवून गेला आहे. विलासकाका यांनी तो साध्य साधन विवेक कधीच ढळू दिला नाही. म्हणून ते युनिक ठरतात. सहकाराचे शुद्धीकरण अन स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकार परत मिळवून देणे या दोन गोष्टीसाठी येथून पुढे काम करावे लागणार आहे. तरच खर्या अर्थाने प्रगतीची कवाडे खुली होतील. त्यांनी यशवंत विचारांचा वारसा चालवलाच नाही. तर तो मनापासून जोपासला. मंत्री असताना त्यांच्या निर्णयावर त्या विचारांची छाप दिसते. त्यामुळेच ते खर्या अर्थाने यशवंत विचारांचे वारसदार आहेत.
आमदार जयंत पाटील म्हणाले, विलासकाका उंडाळकर यांच्यासारखा नेत्यामुळे राज्याची प्रगती होत आहे. ती गोष्ट नजरेआड करून चालणार नाही. विलास काकांनी मंत्री असताना 97 वी घटना दुरूस्तीचा घेतलेला निर्णय सहकारातील भगीरथ निर्णय म्हणून ओळखला जातो. पुरोगामी विचार जपताना बहुजनांसाठी प्रगतीची दारे खुली करून देण्याचे काम विलासकाका यांनी केले. मात्र त्याच कृष्णा काठावर भाजपचे विचार पाय रोवत आहेत. त्याचे दुःख वाटते. त्यामुळे कृष्णा नदीचे पाणी दुषीत होत आहे. आमचे मार्गदर्शक गणपतराव देशमुख व विलास काका यांची मैत्री राज्याला माहितीची आहे. त्या दोघांना एकमेकाशिवाय दुसरा मित्र नाही. मात्र असे असतानाही विचारांचे मंथन व्हावे, यासाठी विलास काकांचा असलेला आग्रह अत्यंत महत्वाचा आहे. त्या विचारांच्या अभिसरणामुळेच समाजाला खर्या, खोट्याची जाण येते.
सध्याच्या स्थितीत राज्यात वाढणार्या प्रतीगामी शक्तीला रोखण्यासाठी विलास काकांसारखे विचार असणार्या नेत्यांचीच गरज आहे. ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी स्वप्न विकणारी अर्थव्यवस्था, गळा भेट, धर्माचे राजकारण, राजकारणाचे धर्म, हिंदुत्व, सहकारातील कर्ज, अर्थकारणातील बदल रोजगारी, अशा सर्वच क्षेत्रांची अवस्था सांगणार्या कविता मांडल्या. त्या उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेल्याने त्याला टाळ्यांची दाद मिळाली. ज्येष्ठ साहित्यिक फुटाणे यांनी त्यांच्या शैलीत चौफेर जोरदार फटकेबाजी केली.
यावेळी डॉ. रथ, माजी जिल्हा पोलिस अधीक्षक माधवराव सानप, पी. बी. पवार, अभय टिळक, दिनेश ओहळकर यांची भाषणे झाली. जयंत कुलकर्णी यांनी स्वागत केले. वसंतराव जगदाळे यांनी आभार मानले.