सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४३ पर्यंत पोहचली असून खबरदारी घेतली जाते. तर दुसरीकडे किडगाव ता सातारा येथे कोरोना टाळण्यासाठी नियमांचे पालन केले तर दूषित पाण्याचे संकट उभे राहिले आहे. याबाबत उपाय योजना सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी होऊ लागली आहे.
याबाबत माहिती अशी की, किडगाव येथील मागासवर्गीय वस्तीला पाणी पुरवठा करणार सार्वजनिक आड (विहीर) आहे. याठिकाणी बौद्ध, मातंग व इतर समाज पाणी घेऊन जातात. या आडाची पूर्वी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत होती. किडगाव ग्रामपंचायत कर्मचारी निर्जंतुकीकरण करण्यासाठी आडाच्या पाण्यात टी सी एल पावडर टाकत होते. मात्र, कोरोना पाश्वभूमी वर लॉक डाउन जाहीर करण्यात आल्यापासून या आडाकडे दुर्लक्ष केले आहे. त्याच बरोबर पिण्याच्या पाण्यात आजूबाजूला असलेल्या झाडाचा पालापाचोळा पडत असल्याने हे पाणी दूषित झाले आहे.
एकीकडे कोरोनाची संकट दुसरीकडे दूषित पाणी अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या किडगाव येथील कष्टकरी, शेतमजूर व सामान्य सुमारे दिडशे ते दोनशे ग्रामस्थ शुद्ध पाणी शुद्ध करून मिळावे या प्रतीक्षेत आहेत.दरवर्षी या आडाच्या पाण्याचा उपसा केला जातो. गावात इतर ठिकाणी असलेल्या विहिरी व आड स्वच्छ आहेत. तसेच सर्वाना सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेचे पाणी उपलब्ध केले जाते ही समाधान कारक बाब आहे. सध्या आरोग्य विभाग व सातारा पंचायत समिती सभापती सौ सरिता इंदलकर यांनी उपयोग योजना करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुधाकर काकडे यांनी दिली आहे.
या आडाचे पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी वैभव राज भोसले, प्रदीप घोलप, निखिल घोलप, बापूराव चतुर, रोहित गाडे, विनायक इंगवले, झाकीर पठाण, विश्वास जाधव व मागासवर्गीय ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले आहे. दरम्यान, पिण्याच्या पाणी म्हणजे जीवनावश्यक द्रव्य आहे. ते शुद्ध हवे. अन्यथा याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ते दूषित पाणी भेट देण्याचा इशारा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते के एस कांबळे व इतर संघटनेने दिला आहे. दरम्यान या प्रश्नाबाबत माहिती घेण्यासाठी किडगाव ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ग्रामपंचयाती ची भूमिका समजू शकली नाही.