वाई : वाईकरांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा व जटील असा असणारा घनकचरा निर्मूलनाचा प्रश्न पालिका प्रशासनाने अतिशय धाडशी पाऊल टाकून निकाली काढला आहे. वाई नगरपालिकेने शहरातील ओला-सुका कचरा गोळा करण्यासाठी दहा घंटागाड्या खरेदी करून वाईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या मदतीनेया प्रकल्पाला निधी उपलब्ध झाला असून, त्यामुळे वाईकर नागरिकांच्या कचर्याच्या समस्या कायमच्या मिटणार आहेत. तसेच ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला सुध्दा यामुळे आळा बसणार आहे, नगरपालिकेचे ठेकेदार संपूर्ण वर्षभरात मुख्य सण, उत्सवाच्या वेळी शहरातील कचरा न उचलता पालिका प्रशासनाला धारेवर धरण्याच्या प्रयत्न करीत, असे या मनमानी कारभाराला आळा बसला असून कचरा निर्मुलना बाबत पालिका स्वयंसिध्द झाली आहे, तसेच दहा घंटागाड्या खरेदी केल्याने पालिकेला त्यातून उत्पन्न सुध्दा घेता येणार आहे, सध्या शहरातील कचरा वाई नगरपालिका स्वतःच्या कर्मचार्यांच्या मदतीने गोळा करणार असून दोन महिन्यांनी शहरातील कचरा उचलण्याच्या ठेका देण्यात येणार आहे, त्यामुळे पालिकेच्या सर्व घंटागाड्या ठेकेदाराला भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. तसेच पालिकेने नाशिकच्या ईबी एनव्होपरो या कंपनीला घनकचरा बायो मायनिंगचा ठेका देण्यात आला असून सध्या तो चांगल्या पद्धतीने कार्यान्वित झाला आहे, त्यामुळे पालिकेच्या सोनापूर येथील कचरा डेपोत ओल्या व सुक्या कचर्यावर निर्मूलनाची प्रक्रिया चालू झाली आहे. यामध्ये जुना कचर्यावर प्रक्रिया केल्यानंतर प्लास्टिक वेगळे, धातू बाजूला करण्यात येवून कुजलेल्या कचर्याची माती होवून त्यापासून उत्तम प्रतीचे खत बनविण्यात येणार असून त्याचा वापर पालिका सोनापूर येथील शेतीमध्ये वृक्षारोपण करून त्या झाडांना त्या खताचा वापर करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या मुख्याधिकारी- विद्या पोळ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पालिकेने यापूर्वी अशा पद्धतीचे प्रयोग अनेक वेळा केले हा प्रयोग किती यशस्वी होते ते येणारा काळच ठरविणार आहे. परंतु सध्या तरी ऐन उन्हाळ्यात पालिकेने कचरा निर्मूलनाची सोय केल्याने वाई करांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
वाई नगरपालिका कचरा निर्मुलनासाठी झाली स्वयंसिध्द
RELATED ARTICLES