सातारा दि4 : ( अजित जगताप) अफवेमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. वित्त व जीवितहानी होऊन सुध्दा काही लोक सुधारणा करीत नाहीत. याची पुन्हा एकदा फलटणकरांना प्रचिती आली आहे. जन धन योजनेचे रक्कम पोष्ट खात्यात जमा झाली अशी समाजकंटकांनी अफवा पसरविली आणि राम प्रहरी पासून विशेषतः गरीब महिलावर्गाने
जनधन योजनेचे पैसे पोस्ट खात्यातून काढण्यासाठी कार्यालयासमोर गर्दी केली होती. याबाबत माहिती अशी की, सध्या सर्वत्र लॉक डाउन मुळे भर उन्हाळ्यात आर्थिक झळ सोसावी लागत आहे. उत्पन्नाचे साधन बंद करून टाकण्यात आले आहे. सुरुवातीला काही चमकू सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी फोटोसेशन करून गरिबांना मदत केली होती. त्यानंतर ”रोजचे मडे त्याला कोण रंडे ” या म्हणी प्रमाणे मदतीचा ओघ कमी झाला. लॉक डाउन मुदत वाढू लागली अशा बिकट अवस्थेचा फायदा घेऊन समाजकंटकांनी अफवा पसरवून गुन्हा केला आहे. त्याचा शोध व मूळ शोधून नुसता गुन्हा दाखल करणे ही प्रक्रिया फक्त न राबविता फलटण पोलिसांनी त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
पोलीस व प्रशासन सातत्याने चांगल्या पद्धतीने नियम पालन करण्यासाठी सांगत आहेत. त्यापेक्षा कोणतीही खात्री न करता अफवेवर विश्वास ठेवून शारीरिक अंतर न पाळता गर्दी होते. ही आता दुर्दैवाने फलटणची ओळख होत आहे. याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. फलटण शहरातील शंकर मार्केट पोस्ट येथील मुख्य कार्यालयात पहाटे सहा वाजल्यापासून जन धन योजनेसाठी नवीन खाते काढण्यासाठी महिला व वृद्धांनी गर्दी केली होती. यावेळी कोणीही थांबवू शकले नाही. याचे नवल वाटू लागले आहे. काही जागरूक नागरिकांनी तातडीने संबधित पोस्ट कार्यालयातील अधिकाऱ्याशी संपर्क साधला असे कुठलेही जन धन योजनेसाठी नवीन खाते उघडले जात नाही.पैसे खात्यात जमा होणार नाहीत असे सांगण्यात आले त्यानंतर फलटण शहर पोलीस स्टेशनचे मा.पोमण साहेबांना सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब खराडे यांनी माहिती दिली. त्यानंतर गर्दी हटविण्यात आली असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.