सातारा : स्वातंत्र्यानंतर देशात मागास व आर्थिक दुर्बल तसेच जातीयतेचे चटके भोगणार्या समाजाला सामाजिक स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यशस्वी ठरले. त्यामुळे गावकुसाच्या बाहेर जीवन जगणार्या लाखो लोकांना प्रतिष्ठा मिळाली. त्यानंतर नुकतेच राज्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या मराठा समाजाला उच्च न्यायालयाने आरक्षण वैध ठरवले. त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला असला तरी मराठा समाजातील गरीब व सुशिक्षित बेरोजगार बांधवांची जाणीव ठेवून आरक्षण नाकारण्याचे धाडस युवराज पवार यांनी दाखवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या तीन वर्षापासून नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार व हत्त्येनंतर मराठा समाजाने न्यायासाठी आवाज उठवला. नराधमांना फाशी व्हावी, अशी सर्वत्र मागणी होत असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी उचलून धरण्यात आली. यानंतर मराठा समाजाने आरक्षणावर फोकस टाकून राज्यभरात लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे 53 मोर्चे काढले. यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाला आर्थिक निकषावर नव्हेतर जात म्हणून आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी परखड भूमिका घेतली होती. राज्यातील राज्यकर्ते व विरोधकांनीही त्याला पाठिंबा दिला. सुरुवातीला शिवसेनेने विरोध केला, परंतू सत्तेच्या सारीपाटात सेनेचा विरोध मावळला. तीन वर्षाच्या संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले. त्याचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली होती. आपणच मराठा समाजाचे कैवारी आहे, हे दाखविण्यासाठी सोशल मीडियावर त्सुनामी आली होती. पण सर्वात लक्षवेधी ठरले ते पुणे जिल्ह्यातील राख, ता. पुरंदर येथील युवराज सुशीला उत्तम पवार हे. त्यांनी मराठा आरक्षण नाकारण्याचे धाडस दाखवून आपल्या समाजातील गरीब व सुशिक्षित बरोजगार बांधवांना त्याचा लाभ मिळावा, या सुप्त हेतूने हा निर्णय घेतला असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गरीबांना आरक्षणाचा लाभ मिळावा, हे स्वप्न पाहिले होते. त्यालाच अनुसरुन युवराज पवार यांनी आरक्षण नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
युवराज पवार हे सध्या धनकवडी, पुणे येथे राहत असून यापूर्वी त्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, हडपसरचे महादेव बाबर, दौंडचे राहुल कुल यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिले आहे. सध्या पुणे येथे सहकारी गृहनिर्माण संस्था कन्सलटंट म्हणून ते काम करीत असून समाजातील गरीब व होतकरु मुलांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे. आरक्षणाचा हेतू हा गरीबांना संधी देणे हा आहे. सध्या अनेकांची आर्थिक परिस्थिती व सुबत्ता असूनही आरक्षणाचा सर्वच स्तरावर लाभ मिळावा, अशी मानसिकता झालेली आहे. अशावेळी युवराज पवार या मराठा समाजातील पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी टाकलेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.
गरीब व सुशिक्षित बरोजगार बांधवांची जाणीव ठेवून आरक्षण नाकारणारा युवराज पवार
RELATED ARTICLES