Monday, June 23, 2025
Homeताज्या घडामोडीराष्ट्रीय महामार्गाचे काम चार पटीने वाढले: : मुख्यमंत्री फडणवीस

राष्ट्रीय महामार्गाचे काम चार पटीने वाढले: : मुख्यमंत्री फडणवीस

* राज्याच्या सिंचन क्षमतेतही लक्षणीय वाढ
* संपूर्ण सातारा जिल्हा दुष्काळ मुक्त करणार
* वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदनिर्मितीचा प्रश्नही लवकरच मार्गी
सातारा : केंद्र शासनाच्या मदतीने राज्यात जलसिंचनाची व रस्ते विकासाची कोट्यवधी रुपयांची कामे सुरू असून राज्याच्या विकासाचा वेग वाढला आहे. 2019 पर्यंत राज्याच्या सिंचन क्षमतेत भरीव वाढ होईल असा विश्वास व्यक्त करत जलयुक्त शिवार, उरमोडी, जिहे-कटापूर योजनांच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. तसेच जिल्ह्यातील मेडीकल कॉलेजच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागला असून एक महिन्याच्या आत पदनिर्मितीचे काम पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील खंबाटकी घाट परिसरातील नवीन सहा मार्गिका बोगदा (3 मार्गिका जुळे बोगदे) पोहोच रस्त्यासहित तसेच हेळवाक ते कराड सेक्शन व सातारा ते म्हसवड सेक्शनच्या दुपदरीकरण या कामांचा कोनशिला अनावरण आणि धोम बलकवडी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी होते.
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सातार्‍याचे पालकमंत्री विजय शिवतारे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर, खा. उदयनराजे भोसले, खा.विजयसिंह मोहिते-पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ .अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील, आमदार सर्वश्री. शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, शंभूराज देसाई, दीपक चव्हाण, सातारा शहराच्या नगराध्यक्षा माधवी कदम, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे उपस्थित होते.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते महामार्ग व सिंचनासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, प्रधानमंत्री सिंचन योजना आणि बळीराजा योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात निधी राज्यासाठी देत आहे. त्यामुळे राज्यात सिंचनाची अनेक कामे सुरू आहेत. जलसंपदा विभागात वेगाने कामे होण्याबरोबरच पारदर्शक कामांवर भर दिला आहे. या विभागात 63 टक्के बिलो टेंडर पध्दतीने कामे सुरू आहेत. या निमित्ताने नवी पारदर्शक कार्यसंस्कृती राज्यात निर्माण झाली आहे.
कृष्णा-भीमा खोर्‍यात दोन प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील सहा महिन्यात 50 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शेतकर्‍यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यावर शासनाचा भर आहे. येत्या काळात पश्चिम महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे. राज्यातील वीजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 1 लाख सौर पंपाचे वितरण केले जाणार आहे. तातडीने नव्या वीज जोडण्या देण्यात येणार आहेत. वीज बिल थकीत असल्यामुळे उपसा सिंचन योजना कार्यान्वित ठेवण्यात मोठे प्रश्न निर्माण होत असल्यामुळे सर्व उपसा सिंचन योजना सौर उर्जेवर आणण्यात येणार आहेत.
राज्य शासनाने पिण्याच्या पाण्यांच्या योजनांवर मोठे काम केले असल्याचे सांगत श्री. फडणवीस म्हणाले, सध्या 8 हजार पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे काम पूर्ण झाले असून नवीन 10 हजार योजनांचे काम सुरू आहे. जलयुक्त शिवार, जिहे-कटापूर, उरमोडी प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्हा दुष्काळ मुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान राज्यात रस्ते विकासांची कामेही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यापूर्वी केवळ 5 हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग राज्यात होते. गेल्या चार वर्षात यात चार पटीने वाढ झाली आहे. राज्य महामार्गांचे 10 हजार किलोमीटरचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात राज्यात रस्त्यांचे चांगले जाळे निर्माण होऊन राज्याच्या विकासाला चालना मिळेल. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. खंबाटकी घाटातील बोगद्याच्या नव्या सहा मार्गिकेमुळे अपघात प्रवणक्षेत्रात होणार्‍या अपघातात मोठी घट होईल.शिवाय प्रवासाचा वेळही वाचणार आहे. त्याचबरोबर मुंबई खोपोली मार्गावर 8 किलोमीटर लांबीचे बोगदे आणि 4 किलोमीटर लांबीच्या केबल ब्रीजचे कामही सुरू करण्यात येणार असून मुंबई-बंगळूरू कॉरीडॉरच्या विकासावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular